प्रतिनिधी / खानापूर : कर्नाटक राज्य रयत संघाच्या वतीने आज खानापूर येथे भव्य रॅली काढून शिवस्मारकातील चौकात तासभर रस्ता रोको करून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य संघटनेचे चन्नाप्पा पुजारी, शिवानंद मुडगी, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक, राजू पवार तसेच के. पी. पाटील यासह अन्य नेते उपस्थित होते. शेतकऱ्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या तसेच तहसीलदार कार्यालयात भ्रष्टाचाराबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या उताऱ्यासाठी व इतर नोंदणीसाठी जादाचे पैसे आकारले जातात. त्याबाबत ही चर्चा करून यावर भ्रष्टाचार रोखण्यासाठी तहसीलदाराने तलाठी पासून सर्व अधिकाऱ्यांना सूचना करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदाराने निवेदन स्वीकारून याबाबत याबाबत आपण सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्येसाठी गुरुवार दिनांक 4 रोजी बैठक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांना सूचना करण्यात येतील असे सांगितले. त्याचबरोबर साखर कारखान्याने यावर्षीचा 2500 रू. दर जाहीर केला. तो अजिबात मान्य नसून याबाबत येत्या काही दिवसात साखर कारखान्याने योग्य दर जाहीर केला नसल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकरी नेत्यांनी दिला.