प्रतिनिधी /सांखळी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमंतकीय जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सांखळी येथे दर रविवारी होणाऱया जनता दरबारात शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्याग्रस्त लोक हजेरी लावून आपल्या समस्या मांडतात. रविवारी सांखळी रवींद्र भवन परिसरात झालेल्या जनता दरबारवेळी मोठय़ा संख्येने लोकांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सांखळी मतदारसंघात तसेच संपूर्ण गोव्यात चांगली कामगिरी बजावत आहेत. ते सामान्य लोकांना भरपूर वेळ देत आहेत. आपली कामे लवकर सुटसुटीत व्हावीत या अपेक्षेने राज्यातील काना कोपऱयातून लोक मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला येत असतात. त्यातील सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होणार असे नसले तरी राज्यातील बहुतेकांच्या समस्या सोडवण्यास ते यशस्वी झाल्याने आमचे काम मुख्यमंत्री करतील या भावनेने आम्ही येत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.