वृत्तसंस्था /सँटॅन्डर (स्पेन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू झालेल्या विश्व कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी ब गटातील सामन्यात भारतीय बॅडमिंटन संघाने ऑस्ट्रेलियाचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. भारताच्या विजयामध्ये युवा बॅडमिंटनपटू उन्नती हुडाची कामगिरी दर्जेदार झाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही लढत अटीतटीची झाली. भारताच्या अर्ष मोहम्मद आणि अभिनव ठाकुर यांना पुरुष दुहेरीचा सलामीचा सामना गमवावा लागला. त्यानंतर भारताच्या महिला बॅडमिंटनपटू इशाराणी बारुआ आणि देविका सिहाग यांनी तसेच मिश्र दुहेरीत टी. विघ्नेश आणि श्रीनिधी नारायणन यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले.
पुरुष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या रिकी तेंग आणि ओटो झाओ यांनी अर्ष मोहम्मद व अभिनव ठाकुर यांचा 21-12, 21-17 असा पराभव केला. त्यानंतर हरियाणाच्या 15 वर्षीय उन्नती हुडाने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी गो हिचा 21-6, 21-9 असा पराभव करत भारताला बरोबरी साधून दिली. पुरुष एकेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॅक यु ने भारताच्या भरत राघववर 21-19, 16-21, 21-15 अशी मात करत पुन्हा आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. महिला दुहेरीच्या सामन्यात इशाराणी बारुआ आणि देविका सिहाग यांनी ऑस्ट्रेलियाच्या डेनिया नुग्रो आणि कॅटरीना तेन यांचा 21-8, 21-8 असा फडशा पाडत भारताला पुन्हा 2-2 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या विघ्नेश आणि श्रीनिधी यांनी ऑस्ट्रेलियाच्या झाओ आणि झेंग यांचा 21-12, 21-16 असा पराभव करीत भारताचा विजय निश्चित केला. या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले.
या स्पर्धेमध्ये भारताचा ब गटात समावेश असून त्यांची ही तिसरी लढत आहे. पहिल्या लढतीत भारताने यापूर्वी आईसलँडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. त्यानंतर दुसऱया लढतीत चीनने भारताचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले होते.
आता भारत आणि स्लोवेनिया यांच्यात ब गटातील शेवटची लढत होणार आहे. 2019 साली झालेल्या या स्पर्धेत भारताला 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.