नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त देश-विदेशात त्यांना अभिवादन करण्यात आले. बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिल्लीतील राजघाटावर नेत्यांची गर्दी झाल्याचे दिसून येत होते. राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचून त्यांना आदरांजली वाहिली. यासोबतच अनेक नेत्यांनीही बापूंना श्रद्धांजली वाहिली आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गांधी जयंतीचे महत्व विशेष असल्याचे सांगत गांधीजींना श्रद्धांजली म्हणून खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी ट्विटद्वारे केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देश-विदेशातील कोटय़वधी लोक स्मरण करून बापूंना आदरांजली वाहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळीच गांधीजींना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते. तत्पूर्वी, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राष्ट्रपिता गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही याचदरम्यान पोहोचले होते.
राहुल गांधी सध्या दिल्लीत नसल्यामुळे त्यांना राजघाटावर उपस्थित राहता आले नाही. मात्र, बापूंचे स्मरण करत राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. ‘बापूंनी आम्हाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालायला शिकवले. प्रेम, करुणा, सौहार्द आणि मानवता याचा अर्थ समजावून सांगितला. आज गांधी जयंतीच्या दिवशी मी देखील शपथ घेतो, ज्याप्रमाणे त्यांनी अन्यायाविरुद्ध देशाला एकत्र केले, त्याचप्रमाणे आपणही आपला भारत एक करू’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही बापूंना आदरांजली वाहत त्यांचे विचार आणि आदर्श देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे ट्विट केले आहे.