म्हैसूर येथे कार्यक्रमाचे आयोजन : राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा आज म्हैसूरमध्ये शुभारंभ केला जाणार आहे. 1.10 कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत. येथील महाराजा कॉलेज मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून म्हैसूरमध्ये मुक्काम करून कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत.
गृहलक्ष्मी योजनेला चालना देण्यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे बुधवारी दिल्लीहून बेंगळुरात आगमन होणार आहे. त्यानंतर बेंगळूरहून म्हैसूरकडे रवाना करतील. सदर कार्यक्रमात बेंगळूर शहर, ग्रामीण, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, कोडगू आणि हासन जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सार्वजनिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी 1 लाख नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत.
राज्यभरात एकाचवेळी चालना
या योजनेचा मुख्य कार्यक्रम म्हैसूरमध्ये होणार असून यासोबतच सर्व जिल्हा केंद्रे आणि ग्राम पंचायतींमध्ये कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. गृहलक्ष्मी योजनेचा मुख्य कार्यक्रम यापूर्वी बेळगाव घेण्याचा निर्णय घेतला होता. पण काही कारणास्तव सदर कार्यक्रम म्हैसूरला हलविण्यात आला आहे.
12,600 ठिकाणी उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण : शिवकुमार
गृहलक्ष्मी योजनेच्या उद्घाटनाचे सुमारे 12,600 ठिकाणी थेट प्रक्षेपण केले जात आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. म्हैसूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. चामुंडी देवीच्या आशीर्वादाने आणि राज्यातील जनतेच्या कृपेने गॅरंटी योजना राबविण्यात आपले सरकार यशस्वी झाले आहे. राज्यातील 1.10 कोटी महिलांपर्यंत गृहलक्ष्मी योजना पोहोचली आहे. गृहज्योती योजना 1.41 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचली असून वीज बिल शून्य आले आहे. 46 कोटी मुलींनी बसने प्रवास केला आहे. तर 1.39 कोटी कुटुंबांना अन्नभाग्य योजनेचा लाभ झाला असून 100 दिवसांत आम्ही खूप काही साध्य केले आहे, असेही ते म्हणाले.