Kolhapur News: सुधाकर काशीद,कोल्हापूर
वेताळ म्हटले की जरा मन चरकतेच.कारण वेताळ म्हटले की त्याच्या जोडीला भूत पिशाच्च या दंतकथा पिढ्या नपिढ्या जोडल्या गेल्या आहेत. पण कोल्हापुरात मात्र वेताळ हा धार्मिक सांस्कृतिक प्रथेचे एक प्रतीक तर आहेच, पण शिवाजी पेठेतील सामाजिक एकजुटीचा तो एक पारंपरिक सोहळा ठरला आहे. आज याच वेताळाचा पालखी सोहळा आहे. कोरोना संसर्गाच्या तीन वर्षाच्या खंडानंतर हा सोहळा होणार असल्यामुळे साऱ्या वेताळ माळचा परिसर दीपावली सारखा उजळला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अंगाने कोल्हापूरच्या परंपरेचा अभ्यास करायचा झाला तर त्यात वेताळ माळ हे स्वतंत्र प्रकरण होईल एवढे त्याचे वेगळेपण आहे.
वेताळ माळ हे एक जरूर पारंपरिक स्थान आहे.पण जुने कोल्हापूर किंवा मूळ कोल्हापूर कसे होते याची अस्सल प्रचिती या वेताळमाळाच्या अस्तित्वाने आजही जिवंत आहे.त्या काळात म्हणजे साधारण दीडशे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या वेताळमाळावर वस्ती नव्हती.किंबहुना कोल्हापूरचे शेवटचे निर्मनुष्य व गुढ दंत कथानी वेढलेले असे हे एक ठिकाण होते.एका बाजूला रंकाळा, दुसऱ्या बाजूला फिरंगाई, वरूणतीर्थ तिसऱ्या बाजूला गंजी माळ आणि त्यात मध्ये हा वेताळ माळ होता.आज परिस्थिती खूप बदलली आहे. एक काळच्या गावाच्या टोकाला असलेल्या म्हणजे दिवसाही जायला भीती वाटणाऱ्या वेताळमाळा भोवती चौफेर वस्ती झाली आहे.आणि वेताळमाळ आता गावात मध्यभागी आल्यासारखी परिस्थिती झाली आहे.
अधिक वाचण्यासाठी- World Heritage Week :दुर्मिळ शस्त्रभांडाराचे शस्त्रास्त्र दालन
माळावरच्या या वेताळ देवाची परंपरा खूप जुनी आहे.पण या वेताळाच्या नावाने 1867 साली वेताळमाळ तालमीची स्थापना झाली. तालमीला वेताळाचे नाव असले तरी स्वातंत्र्य चळवळ त्यानंतर सामाजिक, राजकीय घडामोडीत तालीम कायम अग्रभागी राहिली. ज्यावेळी या माळावर वस्ती नव्हती तेव्हा मुक्ताबाई राऊत ही महिला पिंपळाच्या झाडाखाली रोज पूजा करायची. तिने त्याच परिसरात एक छोटे घर बांधले. त्या पाठोपाठ आजूबाजूला हुजरे, चव्हाण, पाटील, देसाई, कोराने, साळोखे, मगदूम, जाधव, माने, बचाटे नरके पांडे यांची एक एक घरे उभी राहिली व वेताळमाळावर माणसांची वस्ती व्हायला सुरुवात झाली.
वस्ती झाली तरी कोल्हापुरात त्या काळात लाईटची सोय नव्हती.त्यामुळे दिवटी पेटवून प्रकाशाची सोय केली. दिवटीच्या मंद पिवळसर प्रकाशात वेताळबाबाची शिळा अधिकच गुढ दिसत राहिली.आता वेताळमाळाची ओळख कोल्हापुरातील एक धगधगता व जागृत परिसर अशी आहे. कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रात वेताळमाळाचे वेगळेपण आहे. वेताळ म्हणजे भुताचा राजा असल्या दंतकथा केवळ चर्चेत उरल्या आहेत. पण या परिसरातल्या रहिवाशांची वेताळबाबांशी जुळलेली पारंपरिक नाळ आजही कायम आहे. वेताळाची पालखी म्हणजे दिवाळी सारखेच वातावरण झाले आहे.परिसरातल्या छोट्या- छोट्या गल्ल्या फुलांच्या पायघड्यांनी सजणार आहेत. दारा दारात रांगोळीची सजावट असणार आहे. वेताळाची पालखी प्रत्येक गल्लीत फिरणार आहे. हा सोहळा धार्मिक असला तरी त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या सामाजिक पेठापेठातील अस्मितेचे दर्शन घडणार आहे.आणि मूळ कोल्हापूर अशा बारीकसारीक गल्लीबोळातच आजही आपले मूळ अस्तित्व दाखवत जिवंत राहिले आहे.
वेताळाची मूर्ती नाही…
वेताळ माळावर वेताळाची कोठेही मूर्ती नाही. केवळ प्रतीकात्मक दगडी शिळा आहेत. त्यावर छत नाही. पिंपळाच्या विशाल झाडाखाली हा वेताळ विसावला आहे. गेल्या शंभर वर्षात भक्तांनी श्रद्धेने वारंवार त्याला रंगवल्यामुळे त्यावर शेंदरी रंगाचा मोठा थर होता. राऊत परिवाराकडे त्याची पूजा अर्चा आहे त्यांनी या वर्षी रंगाचा थर घासून काढला आहे.आणि इथून पुढे नैसर्गिक दगडी रुपातच वेताळ सर्वांना दिसणार आहे.
पालखी सायंकाळी सात वाजता…
वेताळाचा पालखी सोहळा आज (बुधवार) सायंकाळी सात वाजता आहे. सकाळी अभिषेक व पालखी नंतर महाप्रसाद आहे.
कसबा बावडा येथेही सोहळा.
कसबा बावडा येथेही वेताळ बाबाचे प्रतिक एका दगडी शिळेच्या स्वरूपात आहे. उद्या तेथेही पालखी व धार्मिक सोहळा आहे. एकेकाळी गुढ व निर्जन असलेल्या या परिसराभोवती मोठी वस्ती आहे.