प्रतिनिधी /बेळगाव
छोटी स्वप्ने पाहू नका, सातत्य ही तुमच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट असून, केल्याने होते आहे, आधी केलेची पाहिजे, हे तत्त्व अंगीकारून कार्यरत राहिल्यास निश्चित यश प्राप्ती होईल, असे मत अनंत लाड यांनी व्यक्त केले.
जायंट्स सप्ताहअंतर्गत ठळकवाडी हायस्कूल येथे ‘आजचा विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते. जायंट्स सप्ताहाचे संचालक मदन बामणे म्हणाले, माध्यमिक शाळेमध्येच विद्यार्थ्यांनी आपल्याला पुढे काय करावयाचे आहे, याची दिशा ठरवली पाहिजे. जायंट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी वाचाल तर स्वतःला घडवाल, मोबाईलचा वापर विद्यार्थी दशेतील ज्ञान वाढविण्याकरिता कराल तरच स्वतःबरोबर आपली शाळा, समाज व देश घडवाल, असे सांगितले. याप्रसंगी मोहन कारेकर यांचेदेखील भाषण झाले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक राजू कुडतरकर, सचिव मुकुंद महागावकर होते. प्रास्ताविक सचिव मुकुंद महागावकर यांनी करून जायंट्स सप्ताहाची माहिती दिली. ठळकवाडी हायस्कूलच्यावतीने मुख्याध्यापक राजू कुडतरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुरेश भातखंडे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक हलगेकर यांनी आभार मानले.