वार्ताहर /उचगाव
केंद्र सरकारवतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत उचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सभागृहात बैठक घेऊन गावातील माध्यमिक, प्राथमिक शाळा व अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या तसेच मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत माहिती देण्यात आली.
अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार होते. ग्रा. पं. उपाध्यक्षा मथुरा तेरसे व ग्रामविकास अधिकारी वासुदत्त उपस्थित होते.
तिरंगा ध्वजाचे वाटप घरोघरी करणार
प्रत्येक घरामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने तिरंगा ध्वज वाटप करण्यात येणार आहे. तिरंगा लावत असताना तो कशा पद्धतीने लावावा व त्याची देखभाल कशा पद्धतीने करावी, तसेच 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर ध्वज लावणे गरजेचे आहे, असे केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्याने हा अमृतमहोत्सव गावातील सर्व नागरिकांनी मिळून साजरा करावा, असे सांगण्यात आले.
यावेळी ग्रा.पं. सदस्य एल. डी. चौगुले, बंटी पावशे, मोनाप्पा पाटील, बाळकृष्ण तेरसे, स्मिता खांडेकर, माधुरी पाटील, योगिता देसाई, लक्ष्मी कुराडे, नागरत्ना कोरडे, अनसुया कोलकार, भारती जाधव, दत्ता बेनके, सूरज सुतार, रूपा गोंधळी, यादो कांबळे, हनुमंत बुवा, गजानन नाईक, ग्रा.पं. सचिव सुमेरा मोकाशी व अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी सर्वांना झेंडा कसा लावायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.