वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे भारताचे केंद्र सरकारही सावध झाले असून राज्यांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सलग तिसऱया दिवशी शुक्रवारी राज्यांना सावध केले. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यांना संदेश दिला आहे. सर्व राज्यांनी आपल्या तयारीचा आढावा घ्यावा. ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा आणि लसींची उपलब्धता तपासून पहावी. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज रहावे, असा इशारा त्यांनी दिला. येत्या एक आठवडय़ात सर्व राज्ये तयारीचा आढावा घेणार आहेत.
राज्यांनी टेस्ट-ट्रक-ट्रिट या सुत्राचा अवलंब करावा, लसीकरणावर भर द्यावा, लोकांना मास्क उपयोगात आणण्यासाठी प्रवृत्त करावे, नेहमी हात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरणा द्यावी, शक्य तितक्या प्रमाणात सामाजिक अंतर राखले जावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळण्यास नागरिकांना सांगावे तसेच कोरोना संबंधीच्या अन्य दक्षतांचे पालन करावे असे, आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
जगातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारकडून शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून कळवले आहे. येत्या काही दिवसांत सणांचे दिवस येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय नागरिक बूस्टर डोस घेत असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. चीन, जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता भारत सरकारने सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.