वृत्तसंस्था/ सूरत
संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱया गुजरातने पश्चिम बंगालला 3-0 तर दिल्लीने द्वितीय मानांकित महाराष्ट्राला 3-2 असा धक्का देत 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये पुरुष विभागात अंतिम फेरीत स्थान मिळविले. महिलांमध्ये विद्यमान विजेता महाराष्ट्र व प. बंगाल यांनी सुवर्णपदकाच्या फेरीत स्थान मिळविले.
पुरुष विभागातील जेतेपदासाठी गुजरातची लढत दिल्लीविरुद्ध तर महिलांच्या अंतिम फेरीत विद्यमान विजेत्या महाराष्ट्राची लढत प.बंगालविरुद्ध होणार आहे. महाराष्ट्राच्या महिलांनी उपांत्य फेरीत तामिळनाडूवर 3-1 असा विजय मिळविला, तर बंगालने तेलंगणाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
पुरुषांच्या उपांत्य लढतीत गुजरातचा कर्णधार हरमीत देसाई बंगालच्या अनिरबन घोषविरुद्ध 2-1 असा पिछाडीवर पडला होता. पण अनुभवाच्या जोरावर पुढील दोन गेम 11-4, 11-3 असे घेत त्याने विजय मिळविला. त्यानंतर मानव ठक्कर व मनुष शाह यांनी अनुक्रमे रोनित भांजा व जीत चंद्रा यांच्यावर विजय मिळवित अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
महाराष्ट्र व दिल्ली यांच्यातील दुसरी उपांत्य लढत अटीतटीची झाली. निर्णायक लढतीत पायस जैनने दिल्लीला विजय मिळवून दिला. जैनने प्रथम माजी राष्ट्रीय चॅम्पियन सनिल शेट्टीचा दुसऱया सामन्यात पराभव करून दिल्लीला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडेने यशांश मलिकचा आणि सनिल शेट्टीने सुधांशू ग्रोव्हरचा पराभव करून महाराष्ट्राला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. महाराष्ट्राने मागील आवृत्तीत कांस्यपदक मिळविले होते आणि त्यात सुधारणा करण्याचा त्यांचा इरादा होता. पण पायस जैनने आक्रमक खेळ करीत त्यांचे मनसुबे उधळून लावत महाराष्ट्राच्या दीपक पाटीलचा 11-9, 11-6, 12-10 असा पराभव करून दिल्लीला अंतिम फेरी गाठून दिली.
महिलांच्या उपांत्य लढतीतील पहिल्या सामन्यात तामिळनाडूच्या एस. यशिनीने झुंजार खेळ करीत महाराष्ट्राच्या दिया चितळेला चकित करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. चितळेने पहिले दोन गेम जिंकल्यानंतर चौथ्या गेममध्ये 5-0 अशी बढत घेतली होती. पण यशिनीने बॅकहँडचे शानदार फटके मारत चितळेवर दडपण आणले आणि हा गेम जिंकून 2-2 अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये दोघींनी तोडीस तोड खेळ करीत 5-5 अशी बरोबरी केल्यानंतर यशिनीने चितळेला चुका करण्यास भाग पाडत हा गेम जिंकून तामिळनाडूला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पण नंतर स्वस्तिका घोषने व्ही. कौशिकाचा आणि रीथरिश्या टेन्निसनने अनुभवाचा वापर करीत सी.आर. हर्षवर्धिनीवर मात करून महाराष्ट्राला 2-1 असे आघाडीवर नेले. परतीच्या लढतीत चितळेवर पुन्हा दडपण आले होते. तिच्याकडून सर्वोत्तम खेळ झाला नसला तरी तिने संयम राखत कौशिकाचा पाच गेम्समध्ये पराभव करून महाराष्ट्राला अंतिम फेरीत नेले.
दुसऱया उपांत्य सामन्यात बंगालने तेलंगणाचा 3-0 असा पराभव केला. बंगालच्या ऐहिका मुखर्जीने तेलंगणाच्या अकुला श्रीजाचा 3-2 असा पराभव केला. त्यानंतर सुतीर्था मुखर्जी व अनुभवी मौमा दास यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले.