डॉ. सिद्धराम महास्वामी. यांची संपूर्ण वाटचाल प्रेरणादायी
मनीषा सुभेदार /बेळगाव
जे जे आपणासी ठावे ते दुसऱयाशी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन,
तोची गुरु खरा, प्रथम चरण तयाचे धरा,
हे सूत्र गुरुंना तंतोतंत लागू पडते. जीवनाचे मूल्य शिकवून आपल्याला योग्य मार्ग दाखवितात ते आपले गुरु होत. गुरु भेदाभेद जाणत नाहीत तर मानवतेचे मूल्य अधिक मानतात. धर्माचरण करत असले तरी सर्व धर्म समभावाचे मूल्य रुजवितात. आपल्या जवळील संपूर्ण ज्ञान शिष्याला देऊन तू अधिक बुद्धिमान होण्यासाठी दुसऱया गुरुची निवड केली तरी चालेल, असे सांगण्याचा मोठेपणा दाखवितात.
एक काळ होता जेव्हा गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. पुस्तकी शिक्षणामुळे शाळा आणि महाविद्यालये वाढली आणि गुरुकुल पद्धत काहीशी बाजूला पडली. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण हे केवळ बौद्धिक नव्हे तर ज्ञानाधारित शिक्षणावर भर देणारे असते. व्यक्ती म्हणून तेथे जडणघडण होण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजही अशा पद्धतीचे गुरुकुल शिक्षण दुर्मीळ झाले असले तरी काही आदरणीय स्वामींच्या प्रयत्नांमुळे गुरुकुल पद्धत अद्यापही अस्तित्वात आहे.
कोणत्याही धर्माचे गुरु असोत, ते सन्मार्ग दाखवितात
दोन्ही स्वामींच्या मते कोणत्याही धर्माचे गुरु असोत, ते सन्मार्ग दाखवितात. ऐहिक सुखाची आस बाळगणे गैर नाही. परंतु, त्याचे रुपांतर हव्यासामध्ये होता कामा नये. कोठे थांबावे, हे प्रत्येकाला कळायला हवे. आज कमालीचा भोगवाद फोफावला आहे. अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु, नैतिक मूल्यांच्या आधारेच ते आपल्याला सोडवावे लागणार आहेत.
डॉ. सिद्धराम महास्वामी यांची वाटचाल प्रेरणादायी
बेळगावच्या दोन महास्वामींनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण घेतले असून त्यांच्याकडे आज याच पद्धतीचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृंद येत आहेत. यापैकीच एक आहेत डंबळ गदगचे डॉ. सिद्धराम महास्वामी. त्यांची संपूर्ण वाटचाल केवळ एका समाजापुरती नाही तर सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
सिद्धराम स्वामींनी वयाच्या 13 व्या वषीच आध्यात्मिक साधना करण्याचा निर्णय घेतला. लिंगायत समाजातील मुलांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणजेच बदामी येथील शिवयोग मंदिर होय. याच गुरुकुलमध्ये राहून त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतले. तत्पूर्वी सेंट्रल हिंदू कॉलेजमधून ते पीयूसी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर बनारस विद्यापीठातून बीए आणि एमएची पदवी घेतली. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानाची एमएची पदवी घेतली.
ते म्हणाले, माझे गुरु डॉ. शिवबसव स्वामी हे महान तपस्वी होते. माझ्यावरच नव्हे तर समाजावर त्यांचा प्रभाव होता. 6 नोव्हेंबर 1989 मध्ये त्यांनी माझ्यावर दीक्षा संस्कार केला. म्हणजेच माझ्या हाती झोळी दिली आणि मंत्रोपदेश केला. लिंगायत आध्यात्मिक साधनेमध्ये सहा टप्पे आहेत. ते म्हणजे ‘भक्ता, महेशास्थला, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्मय’.
पहिले तीन भाव देव आणि मी वेगळे आहोत असे सूचित करतो. परंतु पुढील तीन भाव मी आणि देव किंवा परमात्मा वेगळे नसून एकच आहोत, असे मानतो. म्हणजेच माझा स्वतःला तितका विसर पडावा की माझ्या ‘मी’चे मला विस्मरण व्हायला हवे. हेच शिक्षण डॉ. शिवबसव स्वामींनी मला दिले आणि माझ्यावर संस्कार केले. जवळजवळ 30 वर्षे आपण साधना केली.
दीक्षा स्वीकारल्यावर श्वेतवस्त्रांचा त्याग करून भगवी वस्त्रs परिधान करावी लागतात. गुरुकुलमध्ये पहाटे 4 वाजता उठावे लागते. आन्हिके उरकून 6 वाजता अभ्यास, 7 वाजता योगासने, 8 ते 9 पुन्हा स्वतःची कामे आणि 9 ते 1 व 3 ते 5 अभ्यास करावा लागतो. आमच्यावर त्रिस्नान आणि त्रिकाल पूजेचे बंधन असते. स्नान आणि पूजा करूनच प्रत्येकवेळी प्रसाद स्वीकार करावा लागतो. आजसुद्धा या शिवयोग मंदिरमध्ये 45 साधक अध्यात्माचे शिक्षण घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
डंबळ गदगच्या तोंटद सिद्धलिंग महास्वामी या मठाचे मठाधिपती होते. 2018 मध्ये ते स्वर्गवासी झाले. परंतु त्यांनी आपल्या इच्छापत्रामध्ये मला उत्तराधिकारी म्हणून नमूद केले होते. त्यामुळे मला बेळगावहून गदगला यावे लागले. अर्थातच नोव्हेंबर 10 मध्ये मी अल्लमप्रभू या माझ्या शिष्याला दीक्षा देऊन नागनूर मठाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे बेळगाव येथील कारंजीमठाची जबाबदारी डॉ. अल्लमप्रभू या आपल्या शिष्याकडे सोपविल्याचे त्यांनी सांगितले.
आई-वडील आणि गुरु यांच्याप्रति श्रद्धा आवश्यक : गुरुसिद्ध महास्वामी
गुरुसिद्ध महास्वामींचा जन्म बेळगावचा. परंतु त्यांचे शिक्षण बेळगावबाहेर अनेक ठिकाणी झाले. त्यांनीसुद्धा बनारस विद्यापीठातून संस्कृत आणि हिंदी भाषेची पदवी घेतली. तेथे त्यांना डॉक्टर पं. ब्रजवल्लभ द्विवेदी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे आध्यात्मिक गुरु नांगनूर रुद्राक्षीमठाचे शिवबसव स्वामीजी आहेत.
वयाच्या 40 व्या वषी त्यांनी दीक्षा घेतली. बदामी येथील शिवयोग संस्थेमध्येच त्यांनीसुद्धा आध्यात्माचे शिक्षण घेतले. बनारस विद्यापीठातून एमएची पदवी घेतली. कारंजीमठाच्या नागनूर स्वामींनी 1991 मध्ये त्यांना दीक्षा दिली. आज त्यांचे उत्तराधिकारी म्हणून डॉ. शिवयोगी देवरू त्यांच्यासमवेत काम पाहतात.
गुरुसिद्ध स्वामींच्या मते लौकिक शिक्षण तुम्हाला अर्थार्जनाचा मार्ग दाखविते. परंतु आध्यात्मिक शिक्षण जगावे कसे, हे शिकविते. ते शिकविण्यासाठी आध्यात्मिक गुरु हवेत. आई-वडील आणि गुरु यांच्याप्रति श्रद्धा असायलाच हवी. कितीही लौकिक शिक्षण घेतले तर आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रसाराशिवाय समाजात सौख्य आणि शांतता नांदणे अशक्मय आहे आणि त्यासाठी गुरुंची गरज आहे.
सर्व धर्म समभाव रुजावा आणि सन्मार्गाने चालावे हाच संदेश कोणताही गुरु आपल्या शिष्याला देतात. येथील मठामध्ये सामूहिक प्रार्थना होते. शिवानुभव गोष्टी होतात. पुस्तक प्रकाशने होतात. शिवाय ग्रामीण भागात धर्मशिक्षणाचा प्रसार केला जातो. गुरुकुल पद्धत भारतात अतिप्राचीन काळापासून आहे. ती पुन्हा नव्याने गतिमान करायला हवी. जेणेकरून आज निर्माण झालेल्या अनेक समस्यांवर आपल्याला उत्तरे मिळू शकतात, असा विश्वास गुरुसिद्ध महास्वामींना वाटतो.