अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनाला 30 वर्षे होत आली असताना आता काशीमधील ज्ञानवापी मशिदीचा मामला हळूहळू गरम करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. न्यायालयाने आदेश देऊन देखील या मशिदीच्या व्यवस्थापनाने आत जाऊन परिसराची व्हिडिओग्राफी करू दिलेली नाही असे आरोप होत आहेत. हा मुद्दा किती तापणार अथवा त्याला तापवण्याचा प्रयत्न होणार हे लवकरच दिसणार आहे. ज्यांना ज्ञानवापीवरून राजकीय पोळी शेकावयाची आहे त्यांनी त्याला ‘विवादित ढांचा’ बोलणे केंव्हाच सुरु केले आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा 80च्या दशकात तापावयास सुरुवात झाल्यावर आणि बाबरी उध्वस्त केल्यावर जी घोषणा दिली जात होती त्याची आठवण नव्याने होऊ लागली आहे. ‘बाबरी तो इक झांकी हैं, मथुरा, काशी बाकी हैं’ ही त्यावेळची घोषणा होती.
मथुरेला कृष्णजन्मभूमी आणि तिला लागूनच असलेल्या शाही ईदगाह मशिदीबाबतच्या विवादासंबंधी असलेल्या सर्व खटल्यांचा निकाल येत्या चार महिन्यात लावावयाचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थानिक कोर्टाला दिलेला आहे. उत्तरप्रदेश प्रशासनाने राज्यातील सर्व मदरस्यांमध्ये राष्ट्रगीत गाणे बंधनकारक केले आहे.
काशी आणि मथुरा भाजपच्या अजेंडय़ावर नाहीत असे 1997 साली अटल बिहारी वाजपेयींनी घोषित केले होते. तेव्हापासून गंगा-यमुनेमधून खूप पाणी वाहिलेले आहे. एखाद्या मोठय़ा फिल्ममध्ये जशी काही उपकथानके असतात त्याप्रमाणे या ‘ज्ञानवापी’ प्रकरणामध्ये देखील आहेत. दिल्लीमधील जगप्रसिद्ध कुतुब मिनार हा एका हिंदू राजाने बांधला होता आणि 12 व्या शतकात दिल्लीचा सुल्तान असलेल्या कुतुबुद्दीन ऐबकने तो आपला बनवला असे दावे सुरु झाले आहेत. कुतुब मिनारचे नाव ‘विष्णु स्तंभ’ ठेवावे अशी मागणी होत आहे आणि त्याकरता मोर्चेदेखील काढले जात आहेत. कुतुब मिनार समोर हनुमान चालिसाचा पाठदेखील केला जात आहे. कर्नाटकात एक वटहुकूम काढून सरकारने धर्मांतरविरोधी विधेयक आणले आहे.
आग्य्ा्रातील ताज महाल हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. शहाजहानने तो बांधला. या ताज महालमधील काही खोल्या वर्षोनुवर्षे बंद आहेत त्या खोलाव्यात याकरता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत. ताज महाल हे ‘तेजो महालय’ नावाचे शिव मंदिर होते असे दावे होत असल्याने त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी या खोल्या उघडल्या गेल्या पाहिजेत असे वादिचे म्हणणे आहे. त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जोरदार फटकारे लावले आहेत. ‘आधी अभ्यास करा. ताज महाल कोणी बांधला ते नीट शिका. मग विद्यापीठात जा. डॉक्टरेट करा. ताज महाल कोणी बांधला यावरील तुमचा प्रबंध विद्यापीठाला सादर करा आणि नंतरच कोर्टाचा दरवाजा ठोठवा’, अशी तंबी दिली आहे.
काशी म्हणजे देशभरातील हिंदूंचे अतिशय पवित्र स्थळ असल्याने आठ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी हाच मतदारसंघ निवडला होता आणि पुढे काय घडले हा ताजा इतिहास आहे. लोकसभा निवडणूक दोन वर्षावर आली असताना आता खरोखरच नवीन मुद्याचा शोध सुरु झाला आहे का ते येत्या काही महिन्यातील घडामोडींनी दिसेल. आपण 2024 साली हॅटट्रिक करू असा ठाम विश्वास उत्तर प्रदेशच्या निकालानंतर मोदींनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशची निवडणूक म्हणजे ‘80 विरुद्ध 20’ असा मुकाबला असे योगी आदित्यनाथ यांनी घोषित करून हिंदुत्वाची मतपेढी घट्ट केली होती. समान नागरी कायदा लवकरात लवकर आणण्याच्या संकल्पावर दोन-तीन राज्यांनी पाणी सोडले आहे. काश्मीरमधील वादग्रस्त 370 कलम हटवले गेले आहे. त्यामुळे तेथील दहशतवाद संपेल असे सांगितले जात होते. तरी दोन वर्षे उलटूनदेखील अशा घटना घडतच आहेत. गेल्या आठवडय़ात काश्मीर पंडित राहुल भट या सरकारी कर्मचाऱयाची दहशतवाद्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये घुसून हत्या केल्याने खोऱयातील सारा काश्मिरी पंडित समाजच रस्त्यावर आला आहे. सरकारने कितीही दावे केले असले तरी ‘सारे काही ठीक नाही’ असे दाखवत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकात वास्तव समोर येणार आहे. या निवडणूका या वर्षअखेर होण्याची शक्मयता आहे. खोऱयात एक अस्वस्थ शांतता आहे. लडाखमधील चीनच्या घुसखोरीला देखील दोन वर्षे झाली आहेत आणि बऱयाच भागातून अजूनही तो माघारी गेलेला नाही आणि त्याचा जाण्याचा मानस दिसत नाही हा चिंतेचा विषय आहे. चीनबरोबर चर्चेचे गुऱहाळ गेली दोन वर्षे चालवूनदेखील भारताच्या हातात फारसे काही लागलेले नाही. याबाबत विरोधी पक्ष वेळोवेळी आवाज उठवत आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे असंतुष्ट भाजप नेते या अपयशाला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना जबाबदार धरत आहेत आणि त्यांना नारळ दिला पाहिजे अशी मागणी करत आहेत.
गेल्या आठवडय़ात रिझर्व्ह बँकेने अचानक व्याजदर वाढवून मध्यम वर्ग आणि गरीब वर्गाला एक झटका दिला. बँकेच्या या कृतीने ईएमआय देणाऱया लोकांना जास्त पैसे द्यावयास लागणार आहेत. शेजारील श्रीलंकेत महागाईने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने तेथील सरकारचे समर्थकच सरकारवर उलटले आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये बुलडोझरचे राजकारण सुरु आहे. निवडक लोकांची घरे उध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम आहे. आपल्या वृत्तवाहिनीवर खोटी बातमी देऊन राजस्थानात जातीय तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली उत्तरप्रदेशातील एका टीव्ही अँकरला अटक करण्याचे प्रयत्न अजून फोल ठरत आहेत, कर्नाटकात हिजाब प्रकरणाने वादळ माजवले तर आता अजानकरता लाऊड स्पीकर का वापरला जातो आहे यावर महाराष्ट्रात रण माजलेले आहे. हनुमान चालिसा पठणाचे अचानक फॅड आले आहे. कोणी महा आरतीच्या घोषणा करत आहे तर कोणी इतर काही कार्यक्रम. दिल्लीलगत असलेल्या हरयाणामध्ये बेकारीचे प्रमाण देशात सर्वात जास्त आहे असे आरोप होत असताना सर्वात मोठा मुद्दा सार्वजनिक जागी नमाज करण्यास बंदी हा बनवला जात आहे. हे का होत आहे आणि कशाकरता होत आहे हे सारेजण जाणतातच. मोदी सरकारला या महिन्यात आठ वर्षे पूर्ण होत असताना देशाचा प्रवास एकपक्षीय लोकशाहीकडे सुरु झाला आहे, असे काही जाणकार ठासून सांगत आहेत.
सुनील गाताडे