काँग्रेसकडून केंद्राविरोधात आरोपपत्र जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये समाप्त होणार आहे. यापूर्वीच काँग्रेसने एका नव्या अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पूर्ण 130 दिवसांच्या ऐतिहासिक कार्यक्रमानंतर (भारत जोडो यात्रा) पक्षाने ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी या अभियानाचा लोक सादर केला तसेच पेंद्र सरकारच्या विरोधात पक्षाने एक ‘आरोपपत्र’ जारी केल्याची माहिती दिली आहे. 130 दिवसांनी काँग्रेसला देशाच्या जनतेकडून पुरेसे इनपूट मिळाले आहे. पायी चालत लाखो लोकांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला आहे. मोदी सरकारच्या कुशासनामुळे समस्या झेलत असलेल्या लोकांचे दुःख आम्ही समजू शकतो असे उद्गार वेणुगोपाल यांनी यावेळी काढले आहेत.
‘हाथ से हाथ जोडो अभियान’ 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारत जोडो यात्रेचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे घर-घर अभियान चालविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हाथ से हाथ जोडो अभियान हे भारत जोडो अभियानाचा दुसरा टप्पा आहे. भारत जोडो अभियानात विचारसरणीच्या आधारावर राहुल गांधींनी मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांचा निवडणुकीशी कुठलेच देणेघेणे नव्हते. हाथ से हाथ जोडो अभियनात आमचे लक्ष्य मोदी सरकारचे अपयश असून ही मोहीम 100 टक्के राजकीय असल्याचे काँगेस खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.