ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने मंदिर-मशिदींचा प्रश्न सुटला. पण नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर देशाच्या रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता, असं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नितीन गडकरी हे भाजप सरकारमधील कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे आणि त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे विरोधकही त्यांचे कौतुक करताना दिसतात. शनिवारी बुलढाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनीही गडकरींचे तोंडभरुन कौतुक केले. कडू म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. महागाईने कहर केला आहे. मोदी पंतप्रधान झाले आणि मंदिर-मशिदींचा प्रश्न सुटला. पण जर नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर देशाच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटला असता.
ज्यावेळी मोदींनी 100 रुपयांत गॅस वाटला त्यावेळी 400 रुपयांत सिलिंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी यावेळी मोदी सरकारवर केली.