अवजड वाहने थांबविल्याने स्थानिकांना त्रास : अपघातांच्या घटनांमध्ये वाढ : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पोलिसांनी लक्ष देण्याची गरज
वार्ताहर /किणये
बेळगाव शहरामध्ये गेल्या महिन्याभरात तीन अपघातांच्या घटना घडल्या. यामुळे दिवसा शहरातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. शहरातील वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील वाहतुकीकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. कारण हलगा-बस्तवाड बायपास सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहने थांबविण्यात येत असल्यामुळे स्थानिकांना या रस्त्यावरून वाहतूक करणे मुश्किल बनले आहे.
सुवर्ण विधानसौधजवळ असलेल्या हलगा व बस्तवाड या गावांतील नागरिकांना नेहमीच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुवर्ण विधानसौधजवळील पुणे-बेंगळूर महामार्गाच्या बाजूने हलगा-बस्तवाड गावाला जाण्यासाठी बायपास सर्व्हिस रस्ता आहे. हा सर्व्हिस रस्ताच या भागातील नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
अन्… विद्यार्थी तासन्तास बसथांब्यावरच
हलगा रस्त्यावर अवजड वाहने थांबविण्यात येत आहेत. यामुळे परिसरातील वाहनधारकांना ये-जा करणे अवघड बनले आहे. विद्यार्थीवर्ग बसची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला थांबतात. मात्र, रस्त्याच्या बाजूला अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्यामुळे येणारी बस न थांबताच निघून जाते. यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास बसथांब्यावरच ताटकळत बसावे लागत आहे.
बस्तवाड-हलगा भागातील शेकडो विद्यार्थी शाळा- कॉलेजसाठी बेळगाव शहराला येतात. रस्त्यावर मोठी वाहने थांबलेली दिसल्यामुळे बसचालक व वाहक बस थांबवत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही, अशा तक्रारी पालकवर्गातून होत आहेत. हलगा गावाजवळ एका नामवंत कंपनीच्या गाडय़ांच्या दुरुस्तीचे वर्कशॉप आहे. त्या ठिकाणी त्या कंपनीची 80 ते 100 मोठी वाहने रोज थांबलेली असतात. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांची कोंडी होऊ लागली आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी बस्तवाड गावातील महेश कोंबेकर हा तरुण आपल्या दुचाकीवरून गावाकडे येत होता. मात्र, समोर थांबलेल्या अवजड वाहनामुळे त्याचा अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती बस्तवाडच्या नागरिकांनी दिली. या अवजड वाहनांमुळे आमच्या गावातील एका तरुणाचा बळी गेला आहे. प्रशासनाला जाग येणार तरी कधी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
पोलिसांनी दखल घेण्याची मागणी
सुवर्ण विधानसौध जवळच असल्यामुळे या भागात पोलिसांची नेहमी वर्दळ असते. तसेच हिरेबागेवाडी पोलीसही या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. हलगा-बस्तवाड बायपास रस्त्याच्या बाजूला थांबणाऱया या अवजड वाहनांच्या चालकांना पोलिसांनी वेळीच जाब विचारावा व या भागातील वाहनधारक व नागरिकांसाठी सोय करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कायद्याचा आधार घेणार
हलगा-बस्तवाड बायपास सर्व्हिस रस्ता यथील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरूनच वाहनधारक बेळगावला नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा करतात. बसही याच रस्त्यावरून येतात. मात्र रस्त्याच्या बाजूला थांबणाऱया अवजड वाहनांना ते वैतागले आहेत. हलगा ग्रा.पं.वतीने दोन वेळा त्या कंपनीच्या वर्कशॉप अधिकाऱयांना निवेदने दिली आहेत. पण त्यांनी निवेदनाचा विचार केलेला नाही. आता कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहोत.
– सदानंद बिळगोजी- ग्रा.पं.अध्यक्ष, हलगा.
अवजड वाहनांमुळे फटका विद्यार्थ्यांना
या बायपासच्या बाजूलाच अवजड वाहने दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्यासाठी ते या ठिकाणी थांबवलेली असतात. या वाहनांच्या रांगांमुळे येथे बस थांबत नाहीत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. हलगा, बस्तवाड, मस्तमर्डी, के.के.कोप, तारीहाळ बस या रस्त्यावरून येतात. अधिकारी व पोलिसांनी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
-किरण हनुमंताचे, हलगा