पाण्याच्या टाकीवर झाकण बसविण्याची मागणी : किडे- केरकचरा थेट पाण्याच्या टाकीत : नागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रा.पं.ने तोडगा काढण्याची गरज
किणये ; बेळगावचा विकास करण्याच्या उद्देशाने बेळगाव-बेंगळूर महामार्गजवळील हलगा- बस्तवाडनजीक सुवर्ण विधानसौध बांधण्यात आले आहे. विधानसौधमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशनही भरविण्यात येऊ लागले आहे. सुवर्ण विधानसौधसाठी हलगा, बस्तवाड गावातील नागरिकांच्या जमिनी प्रशासनाने घेतलेल्या आहेत. वास्तविक सुवर्ण विधानसौधजवळील गावांमध्ये प्रशासनाच्या सर्व मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र सध्या हलगा गावातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पाहता सरकारने या गावांकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावातील वेशीजवळील चौकानजीकच्या टाकीतील पाणी दूषित होऊ लागले आहे, अशी माहिती काही नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. हलगा-बस्तवाड या दोन्ही गावांना 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांची आहे. सुवर्ण विधानसौध येथे आलेल्या हिडकल धरणाच्या पाईपलाईनमधून थेट पाणी या दोन्ही गावांना पुरविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.
पाणीटंचाईचा गावकरी सामना करीत असतानाच हलगा गावातील नागरिकांना आता दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावातील मरगाई गल्लीच्या कोपऱयावर पिण्याच्या पाण्याची एक टाकी आहे. या टाकीत कूपनलिकेचे पाणी सोडण्यात आले आहे. गावातील निम्म्याहून अधिक लोक या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा पिण्यासाठी म्हणून उपयोग करतात. मात्र या टाकीवर झाकण बसविण्यात आले नाही. ही टाकी उघडय़ावरच आहे. यामुळे झाडाचा पालापाचोळा, केरकचरा या टाकीत पडू लागला असल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली. य् ाा टाकीतील पाणी निम्म्याहून अधिक गावातील लोक पितात, तर उर्वरित भागातील लोक अन्य एका टाकीतील पाणी पितात, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. मुख्य वेशीजवळील या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती गेल्या दोन महिन्याभरापूर्वी ग्रामपंचायतीने केली होती. मात्र अद्यापही या पाण्याच्या टाकीवर झाकण बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे झाडांचा पालापाचोळा, रस्त्यावरून उडालेला कचरा थेट या पाण्याच्या टाकीत पडू लागला आहे.
ग्रा. पं. ने पाहणी करण्यी मागणी
पाण्याच्या टाकीवर झाकण बसविण्याची जबाबदारी कोणाची? ग्रामपंचायतच्या अधिकाऱयांच्या लक्षात ही बाब येत का नाही, असा सवालही नागरिक करू लागले आहेत. य् ाा पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या गटारीतून विशिष्ट प्रकारचे किडे थेट पाण्याच्या टाकीत शिरू लागले आहेत. यामुळे सदर पाणी पिल्यानंतर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.हलगा ग्रामपंचायतीने सदर पाण्याच्या टाकीची पाहणी करावी. टाकीत गटारीतील किडे व केरकचरा पडू लागला आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होण्याआधी, नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याआधीच उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.