हताश होऊन प्रादेशिक आयुक्तांनी बिम्स्मधील प्रकार केला स्पष्ट : बिम्स् हॉस्पिटलमध्ये अजूनही सुधारणा होत नसल्याने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
रुग्ण हा डॉक्टरांसाठी महत्त्वाचा असूनही बिम्स्मधील डॉक्टरांना मात्र रुग्णांवर उपचार करा, यासाठी विनंती करावी लागते. त्यांच्यासमोर मी अक्षरशः हात जोडलो. बिम्स्ची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे, ती कधी सुधारणार? असे हताश उद्गार प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास यांनी काढले.
शिक्षक पदवीधर संघाच्या निवडणुकीसंदर्भात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना बिम्स्बद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. सर्वसामान्य जनतेला वेळेत आणि कमी खर्चात उपचार मिळावेत, यासाठी सिव्हिल हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. मात्र या दोन्ही इस्पितळांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतो. त्याच्यावर उपचार करणे हे तेथील डॉक्टरांचे कर्तव्य आहे. पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याबाबत काही कठोर पावले आम्ही उचलली. त्यामुळे अनेकांनी राजीनामा दिला. तर काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. हे मला माहिती आहे. मात्र आलेल्या रुग्णांवर उपचार करून प्रत्येकाने माणुसकी दाखवावी, इतकीच आमची अपेक्षा आहे. यासाठी डॉक्टरांना योग्य तो मोबदला दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.
बिम्स्मध्ये अजूनही सुधारणा होत नाही. हे दुर्दैव आहे. हे सांगताना मला वाईट वाटते. मात्र सत्य आहे ते बोललेदेखील पाहिजे. सध्या जो सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येतो तो महत्त्वाचा. याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. उपचार करून त्या रुग्णाला बरे केले तर त्यांच्या कुटुंबीयांचा आशीर्वाद डॉक्टरांना मिळतो, हे मला माहीत आहे. मात्र काही जणांना आशीर्वाद नको केवळ पैसा हवा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही काहीच बोलू शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
बिम्स्ची अवस्था दयनीय
बिम्स्मधील अनेक डॉक्टर स्वतःचे खासगी इस्पितळ व दवाखाने स्थापन करून त्याठिकाणी काम करत आहेत. हॉस्पिटलची सकाळी 9 ते सायंकाळी 5 ही वेळ सोडून तुम्ही अवश्य खासगी प्रॅक्टीस करा, असेही आम्ही सांगितले. मात्र काही डॉक्टर अजूनही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच बिम्स्ची अवस्था दयनीय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बिम्समधील एका विद्यार्थ्यांला जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाण करणाऱयांवर एफआयआर दाखल झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबितही करण्यात आले आहे, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.