प्रतिनिधी /पणजी
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गौरवशाली गोवा क्रांतिदिनानिमित्त गोव्यातील जनतेला विशेषतः सर्व स्वातंत्र्यसैनिक, बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, मडगाव येथील 18 जून 1946 ची ती संध्याकाळ गोव्याच्या मुक्ती लढय़ाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय दिवस आहे. याच संध्याकाळी थोर राष्ट्रवादी आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देणारे शूर स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी, मडगाव येथे येऊन पोर्तुगीज राजवटीला झुगारून, जनतेला त्यांच्या मुक्तीसाठी पोर्तुगीज वसाहती विरोधात आक्रमकपणे लढण्यास ऊर्जा देणारे भाषण केले. या दिवशी आपण डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या उत्तुंग कामगिरीला वंदन करूया आणि गोवा तसेच इतर राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करूया, ज्यांनी गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज हयात असलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे देखील कृतज्ञतेने स्मरण करूया आणि त्यांच्या उदात्त सेवेची ओळख कायम मनात ठेऊया, ज्यांच्यामुळे आज गोव्यातील सर्व लोक मुक्तीचा आनंद घेऊ शकतात आणि स्वतःचे भवितव्य ठरवू शकतात. या ऐतिहासिक प्रसंगी आपण गोवा राज्यात शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करूया, असेही राज्यपाल पी. एस . श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा क्रांतिदिनाच्या गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा मुक्ती चळवळीच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.आपल्या संदेशात डॉ. मुख्यमंत्री म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस, गोमंतकीयांच्या मुक्ती लढय़ाचे स्मरण करण्यासाठी ’क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे आणि बलिदानाचे स्मरण करून मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, या संस्मरणीय प्रसंगी आपण सर्व हुतात्म्यांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीस नतमस्तक होऊ या. या महान आत्म्यांच्या बलिदानामुळेच गोवा एक समृद्ध कल्याणकारी राज्य म्हणून आज उंच झेप घेत आहे. आपण गोव्याला आदर्श राज्य बनवण्यासाठी काम करत राहू या. सारे एकत्र हात जोडून कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करू आणि अधिक प्रगती साधण्यासाठी स्वतःला समर्पित करूया. या प्रसंगी, मी स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात शेवटी म्हटले आहे.