रोहित पूर्ण फिट नसल्याने निर्णय, तीन सामन्यांच्या मालिकेला 3 जानेवारीपासून प्रारंभ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लंकेविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंडय़ाकडेन नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 जानेवारीपासून या मालिकेची सुरुवात होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
या मालिकेतील दुसरा व तिसरा सामना पुणे (5 जानेवारी) व राजकोट (7 जानेवारी) येथे होतील. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अंगठय़ाला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेवेळी दुखापत झाली होती. ती दुखापत पूर्ण बरी होण्यास आणखी काही काळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र रोहित टी-20 कर्णधारपद सोडणार आहे का, की हा प्रश्न तात्पुरता लांबणीवर टाकण्यात आलाय, हे स्पष्ट झालेले नाही. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाल्यापासून नेतृत्वात बदल केला जाण्याची चर्चा सुरू असून नव्या निवड समितीची नियुक्ती झाल्यानंतर त्याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी त्या संदर्भात कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
अंदाज वर्तविण्यात आला असला तरी बीसीसीआयच्या बैठकीत भारतीय टी-20 संघाच्या नेतृत्वाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, हे स्पष्ट करण्यात आले. ‘अपेक्स कौन्सिलच्या एजेंडय़ावरही नेतृत्वाबाबत चर्चा हा विषय नव्हता. त्यामुळे त्याबाबत कसलीही चर्चा झालेली नाही. नेतृत्वाचा निर्णय फक्त निवड समितीच घेऊ शकते,’ असे या घडामोडीची माहिती असलेल्या सूत्राने सांगितले. मात्र भारताच्या टी-20 संघाची रचना पूर्णपणे बदलली जाण्याची शक्यता असून अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला रोहितच्या जागी कर्णधारपदी नियुक्त केले जाऊ शकते. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने आपले कौशल्य दाखवून दिले असून हा संघ पदार्पणातच आयपीएल विजेता ठरला आहे.
रोहित शर्माच्या अंगठय़ाला व त्याच्या जवळील स्नायूना दुखापत झाली असून लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी तो यातून लवकर फिट होण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्षभरात फक्त सहा टी-20 सामने होणार असून पुढील वर्षी वनडे वर्ल्ड कप होणार असल्याने त्याच्या तयारीसाठी 50 षटकांच्या सामन्यांना यापुढे अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय 2024 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी रोहितचा विचार केला जाणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे तो टी-20 सामन्यातून माघार घेईल किंवा या प्रकारातून त्याला निवृत्त होण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
बीसीसीआयच्या एका माजी ऑफिस बेअररने अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना असे सुचविले आहे की, ‘लंका मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याने निवड समिती व सचिव जय शहा यांनी घरच्या मैदानावर निरोप घेण्याची संधी रोहितला देण्याचा विचार करावा. असे केल्यास नेतृत्वबदल करतेवेळी त्याचा मानही राखला जाईल.’
मात्र वनडेच्या बाबतीत हार्दिकचा फिटनेस व वर्कलोड मॅनेजमेंट याची छाननी केल्यानंतरच त्याचा विचार केला जाईल, अशी असल्याचेही या सूत्राला वाटते.