ऑनलाईन टीम/तरुण भारत :
हार्दिक पटेल गुरुवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. पटेल यांच्या प्रवेशाबाबत आता भाजप नेत्यांच्या एका वर्गातून नाराजी व्यक्त होत असल्याचे वृत्त आहे. पाटीदार नेत्यामुळे भाजपचे बरेच नुकसान झाल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.
पटेल यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. अलीकडेच त्यांनी ट्विटद्वारे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाने एक चिठ्ठीही लिहिली होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भाजपच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले की, ‘काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, परंतु हार्दिक पटेलने आमच्या पक्षाचे नुकसान केले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते आघाडीच्या नेत्यांपर्यंत बहुतेकांना ते भाजपमध्ये नको आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटीदार आंदोलनामुळे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना त्यांची खुर्ची गमवावी लागली आणि अनेक वरिष्ठ भाजप सदस्यांची घरे आणि कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले. पटेल यांच्या नेतृत्वाखालील पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) या तोडफोडीला जबाबदार असल्याचे मानले जाते.
कोटा आंदोलनातून चर्चेत आलेल्या पटेल यांनी 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. एका वर्षानंतर त्यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्षही करण्यात आले. मात्र, ही खेळी फार काळ टिकली नाही आणि पक्ष नेतृत्व आणि राज्यातील नेत्यांच्या नाराजीमुळे त्यांनी अलीकडेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.