भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. ते गेल्या महिनाभरापासून पक्षाच्या हायकमांडवर नाराज होते. गेल्या महिन्यातच त्यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते. अलीकडेच त्यांनी आपल्या ट्विटर, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवरील बायोमधून काँग्रेसचे चिन्ह हटवले होते.
सोनिया गांधींना पत्र लिहून हार्दिकनी आपल्या पक्षत्यागाची माहिती दिली असून काँग्रेस हायकमांडचे लक्ष पक्षातील समस्यांची दखल घेण्यापेक्षा चिकन सँडविच आणि मोबाईलवर अधिक असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांनी हार्दिकच्या पत्राला भाजपचा अजेंडा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राम मंदिर आणि कलम 370 या मुद्यांवर हार्दिक यांनी भाजपचे कौतुक केले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
हार्दिक पटेलनी राजीनामा देण्यासोबतच सोनिया गांधींना पत्रही लिहिले आहे. या पत्रात हायकमांड प्रश्नांवर गंभीर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी जेव्हा गुजरातच्या समस्या घेऊन पक्षातील वरिष्ठांकडे जायचो तेव्हा ते मोबाईल फोनमध्ये व्यग्र असायचे. राजस्थानमध्ये सचिन पायलटसोबत जे काही घडले; त्याच स्क्रिप्टची गुजरातमध्येही पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हार्दिक पटेलच्या नाराजीनंतर काँग्रेस हायकमांड सक्रिय झाली आहे. हार्दिक पटेल यांनी आपली नाराजी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली होती. त्यानंतर राहुल गांधींनी संदेश पाठवून नाराजीचे कारण जाणून घेतले. मात्र त्यानंतर राहुल यांनी त्यांना काहीच दाद दिली नव्हती. चिंतन शिबिरानंतर सर्व काही ठीक होईल, अशी आशा हार्दिक यांनी व्यक्त केली होती. मात्र हायकमांड दखल घेत नसल्याने अखेर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
चिंतन शिबिरापासून राहिले दूर
13 ते 15 मे या कालावधीत उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी हार्दिकलाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते सहभागी झाले नव्हते. हार्दिक पटेल 2019 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. आता हार्दिक पटेल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते पुढील महिन्यात पक्षात प्रवेश करू शकतात. गुजरातमध्ये सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत.