अध्याय सविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, माझी कथा किंवा माझे नाम हे साऱ्या पातकांचे भस्म करून टाकते. चित्तशुद्धीचे अत्यंत सुगम वर्म ते हेच आहे. अनेक प्रकारचे योगायोग किंवा वेदाध्ययन केले तरी मन पवित्र होत नाही पण हरिकथा श्रवण केली असता अंत:करण पवित्र होते. भगवंतांचे हे बोलणे ऐकल्यावर भगवत्कृपाप्राप्ति होण्यासाठी आपण काय करायला हवं? असा प्रश्न भक्ताला पडणं साहजिक आहे. त्याच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण, गायन आणि कौतुक करतात, माझे चिंतन करतात, चिंतन म्हणजे, कोणतीही गोष्ट त्यावेळेपुरती नि:संदेह समजली म्हणजे मग ती नीट लक्षात रहावी आणि पुन्हा त्याविषयी शंका राहू नये म्हणून त्या गोष्टीचे वारंवार अनुसंधान करणे. माझ्या चिंतनातून त्यांना, मी कोण आहे, कसा आहे हे सर्व ते हरिकथेच्या माध्यमातून समजते. मी भक्तांचा कैवारी आहे ह्याची त्यांना त्या गोष्टीतून खात्री होते. त्यामुळेच ते माझी भक्ती होतात. उद्धवा, हरिकथेचे महत्त्व एव्हढे आहे की, कोणी घरच्या कामासाठी जात असताना हरिकथा सहजासहजी व प्रसंगानुसार कानावर पडली तरी त्या कृष्णकीर्तीच्या कथेची अक्षरे कानांनी ऐकली की, आत असलेली झाडून सारी पातके खडबडून बाहेर पडतात. हरिकथा ऐकल्यामुळे मी माझ्या अवतार कार्यात न्यायनीतीने कसा वागत गेलो हे कळते. दुष्टांचा नाश करून, सज्जन लोकांचे संरक्षण कसे केले हे लक्षात येते. माझ्या कीर्तीचा सुगंध त्यांच्या आसपास दरवळू लागतो आणि त्यांचे मन पालटते मग दुष्कृत्य करायची त्यांना इच्छाच होत नाही. नुसती इच्छाच काय त्यांच्या मनात तसा विचारही येत नाही. म्हणून हरिकथा कानी पडताच महापातकांची राख होऊन जाते. असा पातकाचा केर निघून गेला की, हरिकथेवर अत्यंत भक्ति जडते आणि कथाश्रवणाकडे लक्ष दिले म्हणजे मनही हर्षाने परिप्लुत होते. कथेतील रहस्य जो जो समजावयास लागते तो तो तिच्याविषयी प्रेम वाढत जाते आणि त्या प्रेमाच्या भरात आवडीने ती कथा तो स्वत:च सांगू लागतो. हरिकथा श्रवणाचा परिणाम त्याच्या वागण्याबोलण्यात दिसू लागतो. तो संपूर्ण निरिच्छ होऊन त्याच्या आयुष्याच्या दोऱ्या आनंदाने भगवंतांच्या हाती देतो व तो पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून असतो. त्याचा स्वत:चा संसारही त्याने त्यांच्या स्वाधीन केलेला असतो पण सर्वसामान्य लोक त्याची मन:स्थिती समजू शकत नाहीत. त्यामुळे लोकच काय त्याचे नातेवाईकही त्याला एकसारखे म्हणत असतात की, तू जर सारखा असा देवदेव करू लागलास तर तुझा संसार कसा होणार, तुझ्या मुलाबाळांचे काय होणार अशी भीती घालत असतात पण आपण करतोय ते बरोबरच आहे अशी खात्री असलेला हरिभक्त आप्तइष्टांच्या बोलण्याने घाबरून जात नाही कारण त्याला खात्री असते की, तो करतोय ते बरोबरच आहे. ईश्वर माझ्याकडून चुकीचे काम करून घेणारच नाही अशी त्याला खात्री असते. भक्तीभावाने भगवतकथा गाऊ लागले असता आवड आपोआपच उत्पन्न होते. त्यामुळे तो अधिक आदराने व अधिकाधिक श्रद्धेनेच कथा सांगू लागतो आणि जो जो आवडीने कथा सांगतो, तो तो श्रद्धाही अधिक अधिक वाढत जाते आणि अखेर प्रेमाला पूर चढून त्यात ती श्रद्धाही बुडून जाते. कथाकीर्तनाचे वाढत्या श्रद्धेने प्रतिपादन होऊ लागले म्हणजे विषयासक्ति बाधू शकत नाही आणि तेणेकरून साधकांना मत्परायणस्थिती प्राप्त होते. काही विद्वान मंडळी भगवद्भजन न करता वेदाध्ययन किंवा यज्ञदान करूनच आम्ही तरून जाऊ असे म्हणतात, ते लोक महामूर्ख होत. कारण यात मी कर्ता आहे असा भाव प्रबळ असतो. सहाजिकच ते अहंकारी होतात. भगवद्भक्तीच मुख्य आहे, असा विश्वास ज्यांच्या मनामध्ये असतो ते कायम केवळ माझे आणि माझेच भजन करण्यात धन्यता मानतात. साहजिकच त्यांचा स्वभाव मत्पर होतो. त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मीच आहे असा भाव उत्पन्न होतो. जगात सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे अशी त्यांची खात्री होते.