आॅनलाईन टीम/ तरूण भारत
नवी दिल्ली: महात्मा गांधीजीने ‘खेड्याकडे चला’ असा नारा दिला होता. याचा प्रत्यय आता याची देही याचा डोळा येऊ लागला आहे. रोजच्या कामाच्या धकाधकीतून सर्वांनाच निवांतपणा हवा आहे. गावातील निवांतपणा डोंगर-झाडी अनुभवण्यासाठी आता अनेकांचे पाय वळू लागले आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल आता दिल्लीतही (Delhi) गावचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाने इको-अॅडव्हेंचर टुरिझम पार्क (Eco Adventure Tourism Park) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमका काय आहे हा टुरिझम पार्क जाणून घेऊया.
दिल्लीकरांना रात्रीचा वेगळा अनुभव देण्यासाठी आणि रात्रीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारच्या पर्यटन विभागाने इको-अॅडव्हेंचर टुरिझम पार्क विकसित केला आहे. नजफगढजवळ, दिल्लीच्या नैऋत्य-पश्चिमेकडील कांगनहेरी गावाच्या सीमेवर बांधलेले हे उद्यान या आठवड्यात सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. या उद्यानात २० एसी केबिन आहेत. याला हरित्मा अॅडव्हेंचर पार्क असे नाव देण्यात आले असून ते १६ एकरांवर पसरलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत आल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याचा पर्यटन विभागाचा उद्देश आहे. याठिकाणी गाव तयार करण्यात आले आहे, जेणेकरून पर्यटकांना ग्रामीण वातावरणाचा आनंद घेता येईल. यासोबतच शेती कशी केली जाते याचीही माहिती पर्यटकांना मिळणार आहे.
राहण्याची सुविधा
तुम्हाला जर दिवसा या उद्यानाला भेट द्यायची असेल तर यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता. मात्र तुम्हाला रात्री येथे मुक्काम करायचा असेल तर दोन व्यक्तींच्या जेवणासह पाच हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
आणखी कशाचा आनंद घ्याल
पर्यटनासोबत तुम्ही याठिकाणी मनोरंजनाचाही आनंद घेऊ शकता. याठिकाणी क्लबहाऊस, जकूझी, कम्युनिटी हिट पूल, फिटनेस सेंटर, बिझनेस सेंटर यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासोबतच येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा नागरीकांना मोफत वायफाय ही सुविधा देण्य़ात आली आहे. तसेच वृद्धांसाठी अनेक साहसी खेळही आहेत. झिप लाईन, बोटिंग, बुलफाइटिंग, अॅडव्हेंचर वॉल, मॅजिक शो, रेन डान्सचा अनुभवही घेता येईल. या उद्यानाचे काम २०१५-१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. हे उद्यान लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले. येथे लहान मुले आणि वृद्धांना लक्षात घेऊन उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.