कोल्हापूर जिल्ह्यात सत्तांतर होणार नाही ; मुश्रीफांचा इशारा
Hasan Mushrif : राज्यात सत्तांतर झालं तसेच सत्तांतर आता कोल्हापूर जिल्ह्यात होणार असल्याचा दावा भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काल केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोकुळ संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक आता भाजपच्या ताब्यात जाणार का असा सवाल सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या हातून संघ आणि बॅंक जाणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात जरी सत्तात्तर झाले असले तरी, कोल्हापुरात या दोन्ही संस्थेत सत्तांतर होणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. धनंजय महाडिकांशी (Dhananjay Mahadik) खासगीत भेट झाल्यावर त्यांना मी समजावून आणि पटवून देईन त्यानंतर याबाबतचा उल्लेख ते परत करणार नाहीत, असे त्यांच्या स्टाईलने प्रत्यूत्तर दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आमच्या हातात सत्ता आल्यापासून म्हैशीच्या दुधात लिटरमागे ६ रूपयांनी वाढ तर गाईच्या दुधात लिटरमागे ५ रूपयांनी वाढ केली. गोकुळच्या इतिहास पहिल्यांदाच असं झालं असेल. याशिवाय ३ हजार कोटींचा टर्नओव्हर वाढला. तसेच दुध पावडरीच्या विक्रीत १२ कोटींचा फायदा झाला आहे. मुन्ना महाडिक ( धनंजय महाडिक) यांनी बंटी पाटलांना (सतेज पाटील) उद्देशून बोललं असावं. त्यात हसन मुश्रीफ एक घटक आहे हे कदाचित ते विसरले असतील. राज्यात जरी सत्ताबदल झाले असले तरी जिल्ह्यातील लोक आपलेच आहेत. कार्यकर्त्यांनी खस्ता खाऊन सभासदांना निवडून दिलं आहे. त्यामुळे कोणताही कार्यकर्ता आणि संचालक सत्ताबदलाचा विचार करणार नाही याची मला खात्री आहे.धनंजय महाडिकांशी खासगीत भेट झाल्यावर त्यांना मी समजावून आणि पटवून देईन त्यानंतर याबाबतचा उल्लेख ते परत करणार नाहीत, असे त्यांच्या स्टाईलने प्रत्यूत्तर दिले.