ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी आणि ईडीचा ससेमिरा मागे लावण्यासाठी माझ्यावर हेतुपुरस्सर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे. तसेच हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरमधील मुरगूड पोलिसांनी 23 फेब्रुवारीला मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसोबतच या प्रकरणात सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई तसेच आरोपपत्र दाखल करू नये अशी याचिका मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
मुश्रीफ यांनी 2012 मध्ये अनेक बैठका घेत शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये भागभांडवल गोळा केले. त्याबदल्यात शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला पाच किलो साखर नाममात्र दराने मिळण्यासह अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविली. मात्र, कोणालाही भागधारक केल्याचे प्रमाणपत्र न देता 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप करत मुश्रीफ यांच्यावर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात पावसासह जोरदार वादळी वारे, शेतीला नुकसान