जोंधळा, कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकरी हैराण, वनखाते सुस्त
बेळगाव : बंबरगा परिसरात गव्यांच्या कळपाने मंगळवारी रात्री धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेला जोंधळा आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाले आहे. गव्यांच्या उपद्रवाने परिसरातील शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. वनखात्याने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. कट्टमभावी, बंबरगा शिवारात गव्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान सातत्याने वन्य प्राण्यांकडून शेती पिकाचे नुकसान सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. बंबरगा येथील सीताराम कडेमनी, कल्लाप्पा कडेमनी, परशराम कडेमनी, गुंडू कडेमनी, निंगाप्पा कोले, बाळू कुमाण्णाचे आदी शेतकऱ्यांच्या जोंधळा पिकात गव्यांनी धुडगूस घालून नुकसान केले आहे. गव्यांकडून नुकसान सुरू असले तरी वनखाते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात 50 गव्यांच्या कळपाने हैदोस घालून पिक मातीमोल केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. रात्रभर शिवारात फिरणारे गवीरेडे दिवसभर कट्टनभावी डोंगर परिसरात आसरा घेत आहेत. दरम्यान शेतकरी रात्रीच्यावेळी जोंधळा पिकाची राखण करण्यासाठी गेले असता गवीरेडे शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मागील काही दिवसांपासून कट्टनभागी, बंबरगा डोंगर परिसरात साधारण 50 गव्यांचा कळप मुक्त संचार करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाणे देखील धोक्याचे बनले आहे. उभ्या जोंधळा पिकात आणि कडधान्य पिकात देखील गव्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अलिकडे या परिसरात गव्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. परिणामी शेती कशी करावी या विवंचनेत शेतकरी पडले आहेत.
गणपती कडेमनी
रात्रीच्यावेळी गव्यांचा कळप येवून 1 एकर क्षेत्रातील जोंधळा पिकांचे नुकसान केले आहे. अलिकडे गव्यांचा शिवारात मुक्तपणे संचार सुरू झाला आहे. याबाबत वनखात्याला कळविले असता वनखाते जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे.