माणूस हा स्वतःच्या चुकांसाठी वकील असतो आणि इतरांच्या चुकांसाठी मात्र न्यायाधीश असतो. आयुष्यात आपण अनेक चुका (कधीकधी तर ‘खिळे’ म्हणाव्यात अशा) करून त्याचं समर्थन करीत असतो. दारू पिणं ही त्यातलीच एक चूक. हो. देवदास असो किंवा ‘सूरज डूबा है यारों’ वाला हिरो असो. दोघांचाही उद्योग एकच. तो म्हणजे पिणं. हवं ते सोडून माणसं नको ते किंवा पिऊ नये ते प्यायला लागली आणि अख्ख्या संसाराचाच तोल बिघडला अशी असंख्य उदाहरणं अगदी पुराणकाळापासून मिळतील. ‘एकच प्याला’ हे गडकरिंचं संगीत नाटक खास दारूचे दुष्परिणाम समाजापुढे आणणे यासाठीच होतं. त्यानंतर अत्र्यांनी त्याच नाटकाचं नवीन व्हर्जन केलं. ते भलतंच विनोदी होतं. त्याचा सारांश असा होता की माणसाने दारू प्यावी, पण थोडीच प्यावी. दारूबंदीचा कायदा मूर्खपणाचा आहे असं त्यांचं वैयक्तिक मत होतं असं म्हणतात. प्रथमतः हे पटण्याजोगं नाही वाटलं तरी अनेक उद्योगात असलेले एक समाजाभिमुख व्यावसायिक, लेखक म्हणून अत्र्यांच्या सामाजिक जाणिवा प्रचंड धारदार होत्या. त्यांना लोकांच्या सवयी ठाऊक होत्या. आणि एखादी गोष्ट करू नका म्हटलं की माणूस ती करणारच! ती प्रवृत्तीच असते. तेव्हा दारुबंदी कायदा करून लोकांची जितकी म्हणून धरपकड केली जाईल तितकाच या धंद्यातल्या चोरटय़ा व्यवहारांना ऊत येणार आणि हे रॅकेट तयार होणार! गरज, मग ती चुकीची जरी असली तरी ती एकदा तीव्र झाली की मागणीत वाढ होतच जाते हे साधं गणित. आता कोणत्याही सिनेमा किंवा वेबसीरीजसारख्या अत्याधुनिक माध्यमांचा वापर करतानाही स्क्रीनच्या कोपऱयात ‘दारू पिणे, नशा करणे हे स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे’ असा वैधानिक इशारा दाखवावा लागतो. पण त्याचा नक्की फायदा काय होतो हे पाहणाऱयांना ठाऊक! आपल्याकडे तरी ही सवय पुरुषमंडळींना जास्त आहे असं म्हटलं जातं. त्यांची कारणंही (न) ऐकण्यासारखी असतात.
प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमं हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. असं असेल तर फार पूर्वीपासून ‘पिण्याचं’ कौतुक त्यातच आपल्याला पहायला मिळतं. ‘पिणं’ या विषयाला वाहिलेली असंख्य गाणी आहेत. शिवाय पिणाऱयांना साथ देण्यासाठी स्पेशल गाणी असतात ती आणखी निराळी. अगदी जुन्या देवदासपासून ते नव्या देवदासपर्यंत! शिवाय आताची गाणी तर ‘दो घूँट नशे के मारो’ असं चक्क उघड आवाहन(?) करतात. पण ऐकणाऱयांच्या मनावर न पिताही नशेचं एक तलम अस्तर पांघरणारं एक गाणं आहे. अर्थात गुलाम अली साहेबांचं!
हंगामा है क्यूँबरपा?, थोडी सी तो पी ली है
डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है
हे तत्त्वज्ञान बाकी भारी आहे! आत्यंतिक मलमली आवाज असणाऱया गुलाम अली साहेबांची ही गजल कितीवेळा ऐकली तरी समाधान होत नाही. अर्थात गजलचे शब्द मोठे मार्मिक असतात. सहज जाता जाता विसंगतीवर भाष्य करणं हे त्यांचं वैशिष्टय़ असतं. त्याचप्रमाणे
सूरज में लगे धब्बा, फितरत के करिश्मे हैं
बुत हमको कहे काफिर, अल्लाह की मरजी है
या वरपांगी विरोधी वाटणाऱया ओळी ही विसंगती अचूक टिपतात. अकबर इलाहाबादींचे हे शब्द आणि गुलामअलींचा स्वर ही एक आनंदयात्रा आहे.
ड्रीम गर्ल हेमामालिनी यांच्या अनेक फेमस सिनेमांपैकी एक म्हणजे ‘सीता और गीता’ ज्यात त्यांचा डबल रोल आहे. त्यातली दोन गाणी खास ‘पिण्याला’ समर्पित आहेत. अगदी आत्ता आत्तापर्यंत अभिनेत्रीच्या ओठी मद्याचा प्याला म्हणजे एक तर ती व्हॅम्प किंवा खलनायिका, अशी पद्धत. नायिका जर चांगल्या घरातली मुलगी असेल तर असं काही दाखवणं म्हणजे अशक्मय होतं. पण या सिनेमातील ती दोन गाणी धमाल आणतात. ‘अभी तो हाथ में जाम है’ आणि ‘हाँ जी हाँ मैने शराब पी है’ ही ती गाणी. एका गाण्यात धरमपाजी आणि दुसऱया गाण्यात ती असं दोघांनीही फार छान परफॉर्मन्स दिले आहेत. ‘हाँ जी हाँ’ गायलंय लतादीदींनी आणि ‘अभी तो हाथ में’ चे गायक आहेत मन्ना डे आणि चक्क पंचमदा! ज्यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. ‘हाँ जी हाँ’चंच मराठी व्हर्जन म्हणजे ‘चार दिवस सासूचे’ या मराठी सिनेमातलं अलका कुबल यांच्यावर चित्रित झालेलं
आज काय प्यायले मी नशा जागते
आपल्याच माणसांचे रंग पाहते.
हे गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि स्वर आहे द ग्रेट आशाताई भोसले यांचा. ही अशा प्रकारची गाणी गायची म्हणजे त्या पात्राला चढलेली नशा स्वरातूनही जाणवली पाहिजे. त्यासाठी मग स्वर आकर्षकपणे लांबवणे, अप्रतिम मींडकाम, गाण्याची ओळ संपविताना दिलेले खटके आणि एकूणच साधलेला परिणाम आणि कमाल म्हणजे कमाल सुरेलपणा या सर्व गोष्टींचा मनोहारी मिलाफ आशाताईंनी कितीतरी गाण्यांतून असा काही केला आहे की एकेका गाण्यासाठी एकेक लेख पुरूच नये. तसंच म्हणायचं तर प्याल्यात बुडवून अनेक उत्तमोत्तम कलाकारांनी, कलाक्षेत्रातील मंडळींनी आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतलं असल्याचं वाचायला, ऐकायला मिळतं. पण स्क्रीनवर हेच दाखवण्याचा मोह मात्र त्यांनाही टाळता येत नसावा बहुतेक. देवदासच्या नवीन व्हर्जनमध्ये धुंद अवस्थेतल्या मद्यपींच्या मेळय़ाने मिळून गायलेलं एक गाणं आहे.
शीशे से शीशा टकराये जो भी हो अंजाम
देखो कैसे छलक छलक छल छलक छलक छल छलक छलकता जाये रे
जॅकी श्रॉफ, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या चेहऱयांचा बोलकेपणा खरं तर इथे गाण्याहून जास्त भाव खाऊन जातो. माधुरी तर कहर पोहोचली आहे या गाण्यात. दुःख, अपेक्षाभंग, आनंद या सर्व भावना झरझर तिच्या मुद्राभिनयाने परिणामकारकरीत्या येऊन भिडतात. याच शाहरूखने काजोलसोबत धमाल आणली आहे आणखी एका गाण्यात. या गाण्यात पिणं हा विषय मात्र त्याच्या वाटणीला नाही. सिमरन ऊर्फ सॅनोरिटाच हा गोंधळ घालते आणि तिच्या प्रियकराची मात्र मधल्यामध्ये दामटी वळायची वेळ येते असं त्या गाण्याचं बॅकग्राऊंड आहे.
जरा सा झूम लूँ मैं? जरा सा घूम लूँ मैं?
म्हणत त्याच्या अंगावर येते आणि तो मात्र
अरे ना रे ना रे ना!
म्हणत अक्षरशः तिच्या पाया पडून तिला सावरत राहतो. खरं तर ‘दम मारो दम’ सारख्या गाण्यांपासून हे नव्हतं असं नाही. पण पूर्वीच्या काळी निषेध असलेली एखादी गोष्ट आता शिष्टाचार व्हावी तसं झालं. आणि मग
सूरज डूबा है यारों‘दो घूँट नशे के मारो’
रस्ते भुला दो सारे घर बार के
असं सुरू झालं किंवा
पार्टी ऑल नाईट पार्टी ऑल नाईट
आंटी पुलिस बुलाएगी
असं म्हणत गाणी ‘ओव्हर’नाइट रंगायला लागली.
दारू पिणं किंवा कोणत्याही प्रकारची नशा करणं हे मुळात वाईटच असतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहेच आणि त्यामुळे प्रश्न पडतो, की दारू या विषयावर किंवा ‘नशा’ हा विषय धरून फिल्ममध्ये जी गाणी केली जातात ती खरंच त्या कथेची गरज म्हणून की प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी? की आणखी कशासाठी? पण आजही ‘नशा’ किंवा दारू या विषयावर गाणी सुरूच आहेत. आणि ती तशीच अव्याहत चालू राहणार असं वाटतं.
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू