स्वतः फेऱया घेत घरात आणते वहिनी
गुजरातमधून एका अनोख्या विवाहाचे वृत्त समोर येत आहे. एका बहिणीने स्वतःच्या भावाच्या जागी वर होत विवाहाचे फेरे घेतले आहेत. छोटा उदेपूर जिल्हय़ातील तीन गावांमध्ये वराच्या जागी त्याची बहिण विवाह करण्यासाठी वरात घेऊन जाण्याची प्रथा आहे. वधूसोबत फेरे देखील वराची बहिणच घेते. विवाहाचे सर्व विधी पार पाडल्यावर हे जोडपे वराच्या गावामध्ये परतते.
अंबाला गावातील हरिसिंग रायसिंग राठवा यांचे पुत्र नरेशचा विवाह अलिकडेच फेरकुवा गावातील वजलिया हिंमता राठवा यांची मुलगी लीलासोबत झाला. परंतु अंबालामधून वरात घेऊन नरेश नव्हे तर त्याची बहिण गेली होती. यामागे त्यांच्या गावाची एक परंपरा आहे.
अशाप्रकार विवाह करण्यामागे अंबाला, सूरखेडा आणि सनाडा गावातील आराध्य दैवतासंबंधीच मान्यता आहे. भरमादेव हे ब्रह्मचारी असल्याने या तिन्ही गावातील कुणी युवक वरात घेऊन गेल्यास त्याच्यावर कोप होईल अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. याचमुळे या कोपापासून वाचण्यासाठी वराऐवजी बहिणच वरात घेऊन जाते. विवाहाचे सर्व विधी पूर्ण करून तिच घरात वहिनी घेऊन येते.
अनेक वर्षांपासून परंपरा
ही परंपरा गावामध्ये शतकांपासून चालत आली आहे. अलिकडच्या काही वर्षांपूर्वी तीन युवकांनी या परंपरेला मोडीत काढून त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या तिन्ही युवकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या गावात परंपरेच्या अधीनच विवाह होऊ लागल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे.