प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचे प्रतिपादन
पणजी : ज्याचे पाय सदैव ’भूमीवर’ राहतील तोच कलाकार ’रंगभूमीवर’ टिकू शकेल, असे स्पष्ट प्रतिपादन तब्बल 12500 नाटय़प्रयोग सादर करून अनोखा विक्रम प्रस्थापित केलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकानिमित्त गोवा भेटीवर आलेले प्रशांत दामले व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी शुक्रवारी पणजीत दै. तरूण भारत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी कर्मचाऱयांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी तरूण भारतच्या संचालक सई ठाकूर, तरूण भारतचे संपादक सागर जावडेकर, जाहिरात व्यवस्थापक रवींद्र पाटील, व्यवस्थापक मंगेश काळे यांच्यासह वरिष्ठ प्रतिनिधी जय नाईक, प्रज्ञा मणेरीकर, रिमा केसरकर, प्रीती मराठे, श्रमी भोसले, अमिता सावंत, संजय खेडेकर, शंकर जाधव, संदीप कांबळी, आदींचीही उपस्थिती होती.
कलाकार कितीही मोठा असला तरी त्याच्या अंगी नम्रता आणि कलेशी प्रामाणिकपणा असणे महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा कलाकाराचे पाय सदैव भूमीवरच राहिले पाहिजे. तरच तो रंगभूमीवर तग धरू शकेल, असे दामले यांनी पुढे सांगितले.
’सारखं काहीतरी होतंय’ नाटकाच्या निमित्ताने वर्षा आणि आपण तब्बल 36 वर्षांनंतर एकत्र येत आहोत. त्यामागील कारण म्हणजे ती चित्रपटात रमली होती आणि आपण नाटकात रमलो होतो. दोघांचेही मार्ग वेगळे होते. आता दोन वर्षांपूर्वी जेव्हा ’सारखं काहीतरी होतंय’ ची संधी चालून आली तेव्हा नाटकाची क्रिप्ट वाचताक्षणी त्यातील प्रमुख स्त्री भूमिकेसाठी सर्वप्रथम नाव सूचले ते वर्षा यांचे होते. कारण ते पात्र आव्हानात्मक होते आणि त्यासाठी तेवढय़ाच ताकदीची अभिनेत्री असणे गरजेचे होते, असे दामले यांनी सांगितले.
त्यावेळी बोलताना वर्षा यांनीही बऱयाच वर्षांनंतर आपण नाटक करत आहे आणि तेसुद्धा स्वतःच्या राज्यात होत असल्याने ’बरच काहीतरी होतंय’, असे मार्मिकपणे सांगितले. गोव्यात लोकांना संगीताशिवाय नाटक आवडत नाही. त्यामुळे नाटक निवडताना त्याही बाबीचा विचार करावा लागतो, असे त्या म्हणाल्या.
नाटकात काम करताना तुम्ही त्यातील कलाकारांना साक्षात समोर पहात असतात. चित्रपट किंवा सिरीयलमध्ये समाधानकारक अभिनय होईपर्यंत रिटेक करण्यास वाव असतो. ’डेली सोप’ किंवा सिरीयलमध्ये प्रत्येकाला वेळेची जबाबदारी पाळावी लागते. ते काम अत्यंत महत्वाचे असले तरीही तेवढेच कठीणही असते, असे त्यांनी सांगितले.
प्रशांत दामले यांना ’नियोजनाचे पक्के’ म्हणून ओळखण्यात येते, असे विचारता प्रत्येक गोष्टीत नियोजन हे आवश्यकच असते. केवळ नियोजनच नव्हे तर त्यानंतर आपण वेळेचेही पक्के असावे लागतो. अन्यथा प्रेक्षकांसमोर तुम्ही दर्जेदार कलाकृती सादर करूच शकणार नाहीत. त्यामुळे ती सवय लावून घ्यावीच लागते आणि तशी ती घेतल्यामुळेच आजपर्यंतची यशस्वी कारकीर्द करू शकलो, असे ते म्हणाले.
एखाद्या नाटकाचा विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी विनोदी असेल तर ते नाटक प्रेक्षकांना हमखास आवडते. थोडक्यात सांगायचे तर, दोन सव्वादोन तास धमाल करायची आणि शेवटची काही मिनिटे बाकी असताना गंभीरतेने नाटकाचा विषय मांडायचा’, हे तंत्र असते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
टीव्ही सिरीयलमुळे लोक नाटकापासून दूरावत चालले आहेत का? असे विचारता, ते नैसर्गिकच असल्याचे उसगांवकर यांनी सांगितले. कारण नाटकासाठी तिकीट खरेदी करावी लागते तर सिरीयल्स फुकटात पाहता येतात. त्यामुळे साहजिकच लोकांचा कल तेथे दिसून येत आहे. तरीही लोक आता बरेच चोखंदळ बनलेले असून मोजून मापूनच सिरीयल्स पाहात आहेत. म्हणुनच नवीन सुरू झालेल्या सिरीयल्स सुद्धा एक दोन महिन्यातच बंद पडल्याचे प्रकार अनुभवास आले असल्याचे त्या म्हणाल्या. पूर्वी केवळ नाटका आणि सिनेमा हेच पर्याय होते. आज प्रेक्षकांना यू टय़ूब, नेटफ्लिक्स, ओटीटी यासारखे निवडण्याचे अनेक मार्ग आहेत.
मनोरंजनाचे क्षेत्र ही प्रेक्षकांच्या दृष्टीने सर्वात शेवटची आवड असते. कारण तेथे खर्च करावा लागतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या खर्चाचा यथोचित मोबदला त्यांना मिळवून देण्यासाठी या क्षेत्रातील लोकांनी जास्त लक्ष देऊन काम केले पाहिजे. एकवेळ कथानक दमदार नसले तरी चालेल पण सादरीकरण दर्जेदार झाले पाहिजे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे नटाचे काम असते. तरच प्रेक्षक टिकून राहतो, अन्यथा तुटतो, असे दामले यांनी सांगितले.
कारकीर्दीची सुरुवात नाटकातून केली. त्यामुळे पुन्हा एकदा नाटकांकडे वळायचे होते. मध्यंतरी अनेक हिंदी नाटकातही भूमिका केल्या. परंतु त्यात रमले नाही. त्यामुळे मराठीत मनासारख्या संधीच्या शोधात होते. ‘सारखं काहीतरी होतंय’ नाटकाच्या निमित्ताने तो योग जुळून आला. पुन्हा एकदा ती नाळ जोडली गेली. आणि तेच शाश्वत आहे, असे उसगांवकर यांनी सांगितले. नाटक आव्हानात्मकच असते आणि तो जोम तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवावा लागतो, वाणी स्पष्ट असावी लागते, नाटकही अर्थपूर्ण असले पाहिजे व निर्माता तसेच दिग्दर्शकही तेवढय़ाच ताकदीचे असले पाहिजेत. असा दुर्ग्धशर्करा योग जुळून येतो तेव्हा तुमच्या श्रमांचे चीज होते, असेही त्या म्हणाल्या.
कोवीड काळात प्रत्येक क्षेत्राला तडाखा बसला तसा तो नाटय़-चित्रपट क्षेत्रालाही बसला. त्यातून हातावर पोट असलेल्या अनेक कलाकारांना बेरोजगारीमुळे अत्यंत वाईट दिवस अनुभवावे लागले. ते पाहून आम्ही फार व्यथित झालो. त्यातून शक्य होईल तेवढी मदतही केली. आमचे हात तोकडे पडू लागले तेव्हा जगभरात विखुरलेल्या मराठी माणसांना आवाहन केले. त्यातून मदतीचा ओघ सुरू झाला व आम्ही कर्तव्यभावनेने तो निधी गरजवंतांपर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले, असे दामले यांनी सांगितले.
12500 नाटय़प्रयोगांचा विक्रम करणाऱया प्रशांत दामले यांच्या नाटकांचा एखादा महोत्सव गोव्यात आयोजित करता येईल का? असे विचारता त्यासाठी कुणी पुढाकार घेत असल्यास आम्ही अवश्य योगदान देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. नाटय़क्षेत्रात येण्यास इच्छुक कुणही सर्वप्रथम आपले शिक्षण पूर्ण करावे. त्यानंतर पुढील क्षेत्रात प्रशिक्षण घ्यावे. ज्या भाषेत काम करायचे असेल त्या भाषेवर प्रभुत्व मिळवावे. स्पष्ट आणि छान बोलता आले पाहिजे. एवढे सर्व होऊनही तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ लाभली पाहिजे. तरच यशस्वी कलाकार होऊ शकतो, असे दामले यांनी सांगितले. सई ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले. मंगेश काळे यांनी सुत्रसंचालन केले.