भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा विश्वास
प्रतिनिधी / पणजी
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह बूथ स्तरीय सर्व कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळेच जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार मोठय़ा मताधिक्क्याने विजयी होऊ शकले. याच कार्यकर्त्यांच्या बळावर आता येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपच Eिजकेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.
मंगळवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे कार्यकर्ते विविध उपक्रमांच्या माध्यामतून सतत जनतेच्या संपर्कात असतात. त्याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची लोकांना सोबत घेऊन काम करण्याची शैली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तसेच राज्यात चाललेला विकास पाहूनच लोकांनी भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केले आहे, असे तानावडे म्हणाले.
कोणता विरोधक किती प्रबळ किंवा दुर्बळ आहे त्याची गणिते मांडत बसण्यापेक्षा प्रत्येक विरोधक हा आमच्यासाठी विरोधकच असतो, असे एका प्रश्नावर ते म्हणाले. स्वतःच्या कार्यशैलीवर आमचा विश्वास असल्याने यापुढे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवली तरीही विजय भाजपचाच होईल, असा विश्वासही तानावडे यांनी व्यक्त केला.
रेईश मागूश आणि दवर्लीतून भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती तर कुठ्ठाळीत आम्ही अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता. तिन्ही ठिकाणी आमच्या विद्यमान आमदार तसेच कार्यकर्त्यांनी तन-मानाने प्रचारकार्य केले. त्या दरम्यान आमचे काही रुसलेले-नाराज कार्यकर्ते होते त्यांची समजूत काढण्यात यश आले. त्यामुळे सर्वांनी एकत्रित झटून काम केल्यामुळे भाजपला यश प्राप्त झाले, असे तानावडे यांनी सांगितले. विरोधी मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपला विजय प्राप्त झाला, हा विरोधकांचा दावा त्यांनी खोडून काढला व या विजयासाठी सर्वांचे आभार व्यक्त केले.