तंबाखू सोडा निरोगी व्हा, कोलारच्या डॉ. चारिनी यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा कारागृहातील कैद्यांना सोमवारी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कोलार जिल्हा कोरोना नियंत्रण विभागातील डॉ. चारिनी यांनी कैद्यांसाठी आरोग्यमंत्र दिला. कोरोना नियंत्रणात आहे. म्हणून कोणीही गाफील राहू नये. प्रत्येकांनी चौथ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी बाळगण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
कारागृहातील भगवान गौतम बुद्ध प्रतिमा असलेल्या सभागृहात मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना डॉ. चारिनी पुढे म्हणाल्या, कोरोनामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. केवळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरला. प्रत्येकांना थोडय़ाफार प्रमाणात त्याचा धक्का बसला. आता परिस्थिती सावरते आहे. म्हणून कोणी गाफील राहू नये.
प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी मास्क परिधान करावा. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. आपण राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवावा. समतोल आहाराचे सेवन करावे. रोजच्या जेवणात भाजीपाला व फळांचा वापर अधिक करावा. अशा पद्धतीने स्वतःचे आरोग्य सांभाळताना व्यसनापासून कटाक्षाने दूर राहिले तरच त्याचा फायदा होणार आहे, असा सल्ला त्यांनी कैद्यांना दिला.
तंबाखूचे सेवन करणे आरोग्याला हानीकारक आहे. कॅन्सरमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तंबाखू सेवन बंद करणे शक्मय आहे. जगात तंबाखू सेवन करणाऱयांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळेच तंबाखू उत्पादने करणाऱया कंपन्या अन्य उत्पादन व्यवसायाकडे वळल्या आहेत. स्वेच्छेने तंबाखू सोडून आदर्श जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी कैद्यांना केले.
यावेळी बोलताना कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार म्हणाले, कळत नकळत एखाद्याकडून चुका होतात. मात्र त्याच चिंतेत कोणी राहू नये. भविष्याचा विचार करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावा. व्यसन आणि दुर्गुणांचा त्याग करावा. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पंचशील तत्वांमध्ये याचीच शिकवण दिली आहे. योग, ध्यान, प्रार्थनेमुळे प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल होतो. कैद्यांनी हा बदल करून घ्यावा. यावेळी साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के., वाय. एस. नायक, शशिकांत यादगुडे, अभिषेक, बसवराज बजंत्री आदी कर्मचारी उपस्थित होते.