प्रतिनिधी /बेळगाव
जितो लेडिज विंग बेळगावतर्फे मंझिले या उपक्रमांतर्गत ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु’ या कार्यक्रमाचे महावीर भवन येथे आयोजन करण्यात आले होते. माधवबाग संस्थेचे डॉ. सचिन पाटील यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी माहिती दिली.
डॉ. सचिन पाटील म्हणाले, आधुनिक जीवनात काही सोप्या गोष्टी नियमित केल्या तर आपण आरोग्यवान बनू शकतो. कॅन्सरपेक्षाही उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोगाने भारतीय लोक जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. या रोगांपासून सुटका मिळविण्यासाठी रोज सकाळी नियमित व्यायाम, चालणे व शरीराला गरजेइतकाच आहार घेणे. कार्बोहाईड्रेट्स जास्त न खाता फळे, भाज्या खाव्यात. तेलकट पदार्थ टाळावेत असे सांगितले.
महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी समर्पक उत्तरे दिली. म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकप्राप्त धारिणी महिला मंडळाच्या भगिनींनी भजन सादर केले. अध्यक्षा रुपाली जनाज यांनी स्वागत केले. तृप्ती मांगले यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. शिल्पा शहा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
के. के. जी. झोनच्या समन्वयिका भारती हरदी यांनी आयोजनाबद्दल कौतुक केले. रिटा पोरवाल यांनी सूत्रसंचालन तर रुपा पाटील यांनी आभार मानले.