तरुणभारत ऑनलाइन
पावसाळ्यात थंड वातावरणात सर्वानाच गरमागरम आणि चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात. मग जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भजी ,वडा या तेलकट पदार्थांचे सेवन केलं जाते . पण हे तेलकट पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात . मग अशा वेळेला आरोग्याच्या दृष्टीने झटपट तयार होणारे,कमी खर्चाचे आणि पोट भरणारे सुप हा एकमेव आरोग्यदायी पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे हेल्दी सूप कसे बनवायचे आणि याचे फायदे.
आठवड्यातून किमान तिन ते चार वेळा जेवणात सूप चा समावेष असावा. जिरे,मिरे घालून बनवलेलं सूप हे सुध्दा आरोग्याला अतिशय उपयुक्त ठरु शकते. गूळ, साखरयुक्त तसेच फोडणी दिलेलं सूप शक्यतो टाळावे. वजन घटवायचे असेल तर ताज्या भाज्यांचे सूप, पालक सूप तसेच बीट, गाजर याचे सूप घेऊ शकता. शिवाय मांसाहार प्रेमींनी चिकन सूप किंवा पाया सूप घेऊ शकतात.
टोमॅटो सूप
प्रथम टोमॅटो, कांदा यांचे तुकडे, लसूण, मिरी, दालचिनी, आले, जिरे हे सर्व एकत्र पाणी घालून शिजवा
नंतर मिरी व दालचिनी काढून टाकावी. म्हणजे सूप फार तिखट लागत नाही.शिजलेले टोमॅटो मिक्सर अगर पुरण यंत्रातून काढावेत. त्यांनतर नारळाचे दूध काढून त्यात मिक्स करा.मिश्रण फार दाट वाटल्यास पाणी घालावे. मीठ, साखर घालावी. त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाव वाटी पाण्यात मिसळून घालावे.पाच मिनिटे चांगले उकळून घ्यावे. गार झाल्यावर अर्धा चमचा लोणी घालून हेल्दी टोमटो सूप तयार होते. मिरी व आले, दालचिनी यांचा तिखटपणा येत असल्याने वेगळे तिखट घालू नये.
पालक सूप
सर्वात आधी पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. मग कांदा थोड्या तेलावर परतून घ्या.उकळल्यानंतर त्यात एक टिस्पून मिठ घाला आणि त्यात पालक घाला.दोन मिनिटे त्यात पालक वर खाली करायचा आणि पाण्यातून बाहेर काढून ठेवा.थंड झाल्यावर पालक आणि कांद्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची.
आता एका पातेल्यात तूप गरम करायचे आणि मग त्यात खडे मसाले, हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घालायची. आले-लसूण पेस्ट थोडावेळ परतल्यानंतर त्यात गरम मसाला घालून थोडे परता.
आता त्यात पालकाची प्युरी घालून चांगले दहा मिनिटे ठेवा.म्हणजे पूर्ण कच्चा वास निघून जातो. दहा मिनिटानंतर त्यात धने-जिरे पूड आणि दोन टेबल स्पून दुधावरची मलई आणि 1 टी स्पून मीठ घालून चांगले मिक्स करा. दोन-तीन मिनिटे उकळी येऊ द्या आणि गॅस बंद करा.
चिकन सूप
चिकन स्वच्छ धुवुन त्याचे तुकडे करुन घ्या.
चार कप पाण्यात एका लहान कांद्याचे तुकडे , चिकनचे तुकडे, लहानसा दालचिनीचा तुकडा, चार ते पाच काळीमिरी टाका.
चिकन चांगले शिजू द्या.चिकन शिजल्यावर गाळून घ्यावे. आणि त्यात चवीपुरते मीठ टाका.
रोजच्या आहारात सुपचा समावेश असेल तर सर्दी,ताप, खोकला या आजारांपासून दूर ठेवू शकतात. सूप मध्ये भरपूर प्रमाणात पोषणतत्त्व असतात. त्यामुळे सुप चा आरोग्याला भरपूर प्रमाणात फायदा होतो. शिवाय वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी सुद्धा जास्त प्रमाणात सुप चा उपयोग होतो.