भटक्या कुत्र्यांचा उच्छाद : ग्रामपंचायतींकडून कचरा उचलीकडे दुर्लक्ष
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील चेकपोस्ट नाका, सुळगा-हिंडलगा या गावांच्या मध्यावर नागरिकांकडून टाकण्यात येत असलेल्या कचऱयामुळे भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सदर कुत्र्यांच्या येथील वावरामुळे वाहनांना अपघात होत आहेत.
सोमवार दि. 12 रोजी उचगावचे आदित्य महादेव कदम हे पत्नीसह दुचाकीवरून बेळगावकडे निघाले असता येथे भटकत असलेले कुत्रे आडवे आल्याने अपघात घडला. यामध्ये दोघेही बालबाल बचावले. यासाठी हिंडलगा ग्रा.पं., सुळगा ग्रा.पं. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक, प्रवासी व या रस्त्यावरून ये-जा करणाऱया असंख्य दुचाकी वाहनचालकांतून करण्यात येत आहे.
सुळगा व हिंडलगा ग्रामपंचायतवतीने कचऱयाची उचल वेळेत होत नसल्याने नागरिक घरातील केरकचरा रस्त्याच्या दुतर्फा टाकत आहेत. येथील चेकपोस्टवर कचऱयाचे अनेक ढिगारे दिसून येत आहेत. सदर कुत्री इकडे तिकडे धावत असल्याने धावत्या वाहनांना आदळून अनेक वेळा मोठे अपघात घडले आहेत. यासाठी वरील दोन्ही ग्रामपंचायती आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने येथील टाकाऊ कचऱयाची विल्हेवाट लावावी. येथे कचरा टाकण्यावर नागरिकांना निर्बंध घालावेत, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात येत आहे.