प्रतिनिधी/ बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज अवमान प्रकरणातील खटल्यामध्ये शनिवारी काही कार्यकर्ते गैरहजर राहिले. त्यांना न्यायालयाने दंड सुनावला आहे. जर पुढीलवेळी हजर राहिले नाही तर वॉरंट बजावण्याची शक्यता आहे. शनिवारी दोन खटल्यांची सुनावणी होती. मात्र काही कार्यकर्ते गैरहजर राहिल्यामुळे चार्जफ्रेम करण्यात आली नाही. पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर येथील कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात निषेध नोंदविला. यामुळे 43 कार्यकर्त्यांवर खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्याची सुनावणी येथील तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये होती. मात्र कार्यकर्तेच गैरहजर राहिल्याने चार्जफ्रेम झाली नाही. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार व अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.