नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिवसेना नेमकी कोणाची, या प्रश्नावर आता सर्वोच्च न्यायालयात 12 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी सोमवारी पुढे सुरु होणार होती. तथापि, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपीठाने ती पुढे ढकलली आहे. हे प्रकरण मोठय़ा घटनापीठाकडे सोपवायचे की नाही, यावरही नंतर सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकले जाणार आहेत.
पाच दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही काही सूचना केल्या होत्या. शिवसेनेच्या चिन्हावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत निर्णय घेतला जाऊ नये, 8 ऑगस्टला आयोग प्रतिज्ञापत्रे स्वीकारु शकेल. मात्र, कोणत्याही पक्षाने वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यास या मागणीचा विचार व्हावा, अशा या सूचना आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे त्याने केलेल्या सूचनांवर निवडणूक आयोग काय कृती करणार याकडेही लक्ष लागलेले आहे. सध्या शिवसेनेत दोन गट पडलेले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपलीच खरी शिवसेना असल्याचे प्रतिपादन केले आहे. तर ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार बंडखोर आमदारांनी पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.