नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी दोन दिवसांसाठी लांबणीवर पडली आहे. सोमवार, 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलल्याने बुधवार, 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला आता 3 ऑगस्टला होणार आहे. मुख्यत्वेकरून राज्यातील सत्तापेचावर शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. याचदरम्यान निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस पाठवली होती. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.