ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (supreme court) पाच न्यायधिशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत (Justices U U Lalit) यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश असून उदय लळीतयांनी या घटनापीठात स्वतःचा समावेश करून घेतला नाही. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांची अपात्रता आणि इतर याचिकांवर कोर्टानं कोणताही निकाल दिलेला नाही. याशिवाय या प्रकरणात अनेकदा कोर्टात सुनावणी झाली असून कोर्टानं नेहमीच ‘तारीख पे तारीख’ दिल्यानं हे प्रकरण लांबलेलं होतं. त्यामुळं आज सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या सुनावणीत सर्व याचिकांचा निकाल लागणार का? याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे ही वाचा : सत्ताप्राप्तीसाठी राजकारणात कुणालाही पक्षप्रवेश; गिरीश बापट यांचा भाजपाला घरचा आहेर
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शेवटची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. पुढील सुनावणी घटनापीठासमोर होईल, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर सत्तासंघर्षाच्या प्रकरणाच्या सुनावणीला तारीख मिळाली नाही. आज याप्रकरणी सुनावणी होणार असून निवडणूक आयोगावर सुनावणीसाठी घातलेली बंदीही आज उठू शकते. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे.