ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला असून, याप्रकरणावर आता उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे, निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
सुनावणीपूर्वी शिवसेनेकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. यात माविआच्या प्रयोगावर मतदार नाराज असल्याचा शिंदेंचा दावा खोटा आहे, असे नमूद करण्यात आले होते. तसेच गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आक्षेप का घेतला नाही? असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला. शिवसेनेच्या या प्रतिज्ञापपत्रानंतर शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यात त्यांनी 16 आमदारांवरील कारवाई अयोग्य असल्याचे नमुद केले आहे. दरम्यान, या प्रकरणावरील आजची सुनावणी पूर्ण झाली असून, उद्या यासंदर्भातील पुढची सुनावणी पार पडणार आहे.
हेही वाचा : गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षातून एकदाच घ्यावी लागणार परवानगी