ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कडक उन्हाळा पडला की अनेकांनी उष्माघाताचा त्रास जाणवू लागतो. यासाठी घरगुती उपाय शोधले जातात. अनेक रस, काढा यांचा मारा केला जातो. अशावेळी आपल्या शरीरावर याचे दुष्यपरिणाम होऊ शकतात. आधीच उन्हाचा पारा आणि त्यातच चुकीच्या पध्दतीने उपचार केल्यास याचा नाहक त्रास आपल्याला जाणवू लागतो. उष्माघातासोबत अतिसार हाण्याचे प्रमाण ही या दिवसात वाढते. हा अतिसार का होतो, याची कारणे काय, उपाय काय करावेत तसेच उष्माघात म्हणजे काय आणि याचे नेमके काय परिणाम होतील हे जाणून घेऊया.
सुरवातीला उष्माघाताची लक्षणं कशी ओळखायची हे जाणून घेऊया
तुम्हाला जर उष्माघाता झाला असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे, मळमळ,उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा कोरडी पडणे,अशक्तपणा जाणवणे, त्वचा लालसर होणे, सुस्ती आल्यासारखं वाटणे अशी प्राथमिक लक्षण जाणवू लागतात. असं काही जाणवल तर वेळ न घालवता डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी नियमित ७-८ ग्लास पाणी प्या. आंघोळीसीठी थंड पाण्याचा वापर करा. उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. ज्याला उष्माघाताचा त्रास आहे त्याने तर सुती कपडेच वापरावेत. दिवसभरात उन्हात काम असेल तर चेहरा थंड पाण्याने सतत धुत रहा. उन्हात बाहेर जात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फचा वापर करा. खाण्यामध्ये पाणीदार फळांचा समावेश करा. यामध्ये काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.या दिवसात अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा. अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
अतिसार Diarrhea Symptoms
भारतात प्रत्येक वर्षी अंदाजे साडेतीन लाख मुले अतिसारामुळे बळी जातात. त्यात मुलांचे प्रमाण अधिक असते. पाच वर्षाखालील मुलांना अतिसाराची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अन्नबाधा तसेच औषधाच्या अतिसेवनामुळेही अतिसार होतो. यामुळे वारंवार मलप्रवृत्ती होते. सतत मलप्रवृत्ती झाल्याने अशक्तपणा जाणवतो, वजन कमी होते आणि याचा परिणाम अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आज आपण अतिसाराची लक्षणे काय आहेत त्यावर उपाय काय आहेत जाणून घेऊया.
लक्षणे
अतिसार झाल्यानंतर सुरवातीला पोटात कळा मारण्यास सुरुवात होते. ताप येतो त्यानंतर उलट्या सुरु होतात. काही खावेसे वाटत नाही. दोनहून अधिक वेळा शौचास जावे लागते, विषाणूंच्या संपर्कामुळे आणि जिवाणूजन्य संसर्गामुळे अतिसाराचे प्रमाण वेगाने वाढते.
उपाय
अतिसार जादा प्रमाणात झाला की शरीर थकायला सुरु होते. तसेच शरीरातील झिंकचे प्रमाण कमी होते. यासाठी भरपूर द्रवपदार्थ प्या. पाणी उकळून गार करुन प्या. पाणी फिल्टर करणे शक्य नसेल तर त्यात तुरटी फिरवा. पाणी गाळून प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. जुलाब झाल्यास मीठ, साखर पाणी दर तासाला प्यावे. तुम्हाला जादा आवश्यक्यता वाटली तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.