कडक ऊन्हामुळे अंगाची लाही-लाही : थंडाव्यासाठी नागरिकांची धडपड, दक्षता घेण्याचा आरोग्य तज्ञांचा सल्ला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेला बुधवार देशभरात उष्णतेचे थैमान घालून गेला आहे. पण याहीपेक्षा अधिक तगमग मे महिन्यामध्ये होणार आहे. सर्वसाधारणपणे 15 मे च्या आसपास जे तापमान असते, ते यावेळी एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातच गाठले गेल्यामुळे मे मध्ये काय होणार या नुसत्या विचारानेच अंगाची लाही-लाही झाल्यास नवल नाही. यंदाचा उन्हाळा अशाप्रकारे लक्षात राहण्यासारखा असेल, असा इशारा देण्यात आला असून आरोग्यासंबंधी दक्ष रहा असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
पर्जन्यमान विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या देशभरात उष्म्याचा कहर सुरु आहे. त्यातही विशेषतः सात राज्यांमध्ये जीव कासावीस करणारी उष्मालाट असून ती आणखी 3 ते 5 दिवस आपला प्रभाव दाखविणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशा या सात राज्यांमध्ये 1 ते 3 मेपर्यंत ही लाट राहील. तर बिहार, छत्तिसगड, चंदिगढ, दिल्ली आदी भागांमध्ये ती आणखी एक-दोन दिवस असेल. गुजरातमध्ये तिचा प्रभाव आता कमी झाला आहे. तरीही तापमान उच्चच राहणार आहे. लाट ओसरल्यानंतर ते 2 डिग्री कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सर्वत्र तापमान सध्या 43 ते 45.6 डिग्री सेल्सिअस इतके असून दुपारी काम करणेही लोकांना अशक्य झाले आहे.
पावसाचीही शक्यता
देशाच्या पश्चिम भागात तसेच उत्तर भागात वाऱयांचा वेग येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असून अनेक स्थानी हलका ते मध्यम पाऊस होण्याशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. साहजिकच यामुळे तापमान कमी होऊन लोकांना अतीआवश्यक असणारा थंडावा मिळू शकतो. तरीही त्यानंतर मे च्या मध्यापर्यंत तापमान आतापेक्षाही अधिक वाढून उष्मालाट भरात येऊ शकते.
गेल्यावर्षीपेक्षा जास्त
एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात देशात गेल्या एप्रिलपेक्षा जास्त उष्णतेचा अनुभव येत आहे. तापमानात किमान 1 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली असल्याचे स्पष्ट केले गेले. गेल्या पन्नास वर्षांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात इतके तापमान क्वचितच अनुभवावयास मिळल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
दिल्लीत यलो अलर्ट
दिल्लीत गुरुवारपासून पुढचे काही दिवस यलो अलर्ट घोषित करण्यात आला. चार रंगांमध्ये हा इशारा देण्यात येतो. हरित सूचना असेल तर कोणतीही चिंता करण्याचे कारण नसते. पिवळा (यलो) इशारा असेल तर सावध रहावे लागते. केशरी इशारा असेल तर उपाययोजनेची सज्जता ठेवावी लागते तर तांबडा इशारा (रेड अलर्ट) असल्यास त्वरित कारवाई करुन स्वतःचे संरक्षण करावे लागते.
पाणी…पाणी
उष्म्यापासून संरक्षणाचे एकमेव स्वस्त साधन म्हणजे पिण्याचे पाणी हे आहे. त्यामुळे पाणी आणि पाणी अधिक असणाऱया पदार्थांची मागणी वाढली आहे. याच काळात पाण्याची टंचाईही अनेक भागांमध्ये असते. त्यामुळे अनेकदा दुहेरी संकटाशी दोन हात करावे लागतात. उत्तर भारतात काही भागात ही स्थिती आहे.
कोणती उपाययोजना करावी…
ड भरपूर पाणी प्यावे पण ते अतिथंड नसावे. फळांचा रस, पालेभाज्या आणि फळे यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. गोड ताक, दूध, नारळाचे पाणी यांचा आहारात समावेश असावा. मात्र, शीतपेये (कोल्ड्रिंक्स) कमी प्रमाणातच असावीत. उन्हातून आल्यानंतर त्वरित ही शीतपेये अजिबात पिऊ नयेत, असे अनेक सल्ले आरोग्य तज्ञांनी दिले असून त्यांचे पालन आवश्यक आहे.
ड हलका आणि पचावयास सोपा आहार घ्यावा. अतिखाणे टाळावे. अतितिखट, तेलकट, मसालायुक्त पदार्थांचे सेवन शक्यतो करु नये. करावेच लागल्यास प्रमाण अत्यल्प ठेवावे. कलिंगड, टोमॅटो, काकडी, मोसंबी इत्यादी रसदार पदार्थ आहारात असावेत. मात्र, ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी गोड फळे खाताना आपल्या आहारतज्ञांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात खाण्याचे पथ्य पाळावे.
ड पांढऱया किंवा हलक्या रंगांच्या कपडय़ांची वेषभूषा करावी. गडद रंगांचे कपडे टाळावेत. अंगाला घट्ट बसतील असे कपडे फॅशन म्हणूनही या काळात घालू नयेत. दुपारी 1 ते 4 या काळात उन्हात जाणे टाळावे. ते शक्य नसल्यास डोक्यावर पांढऱया रंगाचे फडके किंवा सैल टोपी घालावी. उपाशी पोटी उन्हात जाऊ नये. अशा सूचना उष्माघातापासून वाचण्यासाठी तज्ञांनी दिल्या आहेत.