रेईस मागूस जिल्हा पंचायत पोट निवडणूक वार्तापत्र, चार उमेदवार रिंगणात
प्रतिनिधी /पर्वरी
रेईस मागूस जिल्हा पंचायत मतदार संघात होवू घातलेल्या पोट निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळेस संदीप बांदोडकर (भाजप), प्रगती पेडणेकर (काँग्रेस), राजेश दाभोळकर (अपक्ष), साईनाथ कोरगावकर (आरजी) हे उमेदवार आपले नशीब अजमाविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होईल. माजी जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक यांनी भाजप पक्षाचा त्याग करून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थाना ग्रामपंचायत निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसातच जिल्हा पंचायत निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याने मतदार कमालीचा नाराज झाला आहे. त्यामुळे यावेळेस मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्मयात आहे.
नुकतेच भाजप उमेदवार संदीप बांदोडकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे आणि आमदार केदार नाईक यांच्या उपस्थिती बेती येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दुखावलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा पुष्प देऊन सन्मानाने पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. पण या कार्यक्रमात माजी मंत्री दिलीप परूळेकर आणि जयेश साळगावकर कुठे दिसले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते आपआपसात चर्चा करताना दिसत होते. तसेच यावेळी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे काही कार्यकरर्त्यंनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
दिलीप परूळेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
एरवी पोटनिवडणुकीला जास्त महत्व नसते, पण नुकतेच साळगाव मतदारसंघातील आमदार केदार नाईक यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने या मतदारसंघात या निवडणुकीला वेगळेच वळण लागले आहे. सध्या माजी आमदार जयेश साळगावकर विरुद्ध विद्यमान आमदार केदार नाईक असे चित्र आहे. एक जण आपले पक्षातील स्थान आणि अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे तर दूसरा ही निवडणूक जिंकून आपले पक्षातील स्थान आणि महत्व अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ‘कावळे’ पक्षात परत आल्याने ‘बगळय़ांची’ स्थिती केविलवाणी झाली आहे. माजी मंत्री दिलीप परूळेकर या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या पक्षाने त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
मतदारसंघात चार पंचायतींचा समावेश
भंडारी समाजाचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे. त्यामुळे भंडारी समजाचाच उमेदवार निवडून येण्याची शक्मयता जास्त आहे. या मतदारसंघात रेईस मागूस, पिळर्णामार्रा, नेरूल आणि सांगोल्डा या चार पंचयातींचा समावेश असून एकूण 18467 इतके मतदार आहेत. त्यात पुरुष 9129 तर महिला 9338 यांचा समावेश आहे.
मतदारांचा कल भाजपच्या बाजूने
भाजपचे उमेदवार संदीप बांदोडकर यांना निवडून आणण्याचा चंग आमदार केदार नाईक यांनी बांधला आहे. आरजी पक्षाचे काही कार्यकर्ते भाजप मध्ये सामील झाल्याने त्याचा थोडाफार फायदा बांदोडकर यांना होणार आहे. तसेच स्वतः बांदोडकर पिळर्ण पंचायतीचे सरपंच, पंच होते. तसेच त्यांची पत्नी या पंचयातीच्या विद्यमान सरपंच आहेत. त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्मयता आहे. सध्या मतदारांचा कल भाजप पक्षाच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र आहे. कारण जो तो ‘उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यात’ धन्यता मानतो.
काँग्रेस पक्षातर्फे प्रगती पेडणेकर रिंगणात
काँग्रेस पक्षातर्फे प्रगती पेडणेकर यांचे नाव जाहीर झाले आहे. पेडणेकर यांनी गत निवडणूक गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पाठिंब्यावर लढविली होती. पण त्यात त्यांना अपयश आले होते. त्यानीही आपल्या परीने प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात ख्रिश्चन समाजाचे मतदार मोठय़ा संख्येने असून ते यावेळेस त्यांच्या बाजूने मतदान करतील अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्या वेळेस त्यानी जवळजवळ दीड हजाराच्या आसपास मते मिळविली होती. सध्या त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे फरक होईल असे वाटते.
राजेश दाभोळकर यांना ‘आप’चा पाठिंबा
समाजसेवक राजेश दाभोळकर हे अपक्ष असून ते ‘विमान’ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्यांना समजसेवेचा भरपूर अनुभव आहे. ते गेली अनेक वर्षे गरीब आणि हुशार शालेय मुलांना वह्या तसेच अन्य साहित्य वाटप करीत आहेत. ते हे काम आपल्या मतदारसंघापूरते न करता सर्व गोवा व अन्य राज्यातही करतात. देवी सरस्वतीचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे लोक आपल्या बाजूने मतदान करतील असे त्यांना वाटते. तसेच आम आदमी पक्षाने त्यांना पाठिंबा दिला असून त्याचा काही प्रमाणात त्यांना फायदा होईल असे वाटते.
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे साईनाथ कोरगावकर आपले नशीब अजमाविण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ‘चर्च’ ने या पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात मते मिळाली होती. पण यावेळेस त्यांना ‘चर्च’चा पाठिंबा नाही. या पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांचीही सभा या भागात झाली आहे. या वेळेस चौरंगी लढत होईल असे दिसत आहे. तसेच ही निवडणूक माजी आमदार साळगावकर आणि विद्यमान आमदार नाईक यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे असे दिसत आहे.