नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सोमवारी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. ‘अमृत महोत्सवा’मुळे यावेळचा स्वातंत्र्यदिन देशवासियांसाठी खूप खास आहे. मुख्य सोहळय़ात दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. तेथून ते नवव्यांदा देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधानांचे भाषण विशेष असेल असे मानले जात आहे. या सोहळय़ाची रंगीत तालीम आणि पूर्वतयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्लीत सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी सोहळय़ानिमित्त शनिवारपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीपासून गावोगावी या सोहळय़ाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.