कंग्राळी खुर्दचा जुना पूल पाण्याखाली : नदीकाठावरील पिकांना धोका : जनजीवन गारठले
प्रतिनिधी /बेळगाव
मागील चार दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी रात्रभर झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शिवाय जनजीवन देखील पूर्णपणे गारठून गेले. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले आणि जलशयांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. दरम्यान, कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीवरील जुना पूल तिसऱयांदा पाण्याखाली गेला आहे.
शनिवारी रात्रभर पावसाने जोर वाढवला होता. तर रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. शिवाय दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत गारठा होता. बाप्पाला निरोप देऊन घरी परतल्यानंतर पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर रात्रभर पाऊस सुरूच होता. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी पावसामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे बाजारातही तुरळक प्रमाणात ग्राहक दिसून आले. जोरदार पावसाचा बाजारपेठेवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. मागील आठ दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे गणेशोत्सवातदेखील पावसाचा व्यत्यय आला होता. विसर्जना दिवशी दिवसभर पावसाने उसंत घेतली असली तरी बाप्पांना निरोप दिल्यानंतर मात्र रात्रभर पावसाने मारा केला.
बाजारपेठेवर परिणाम
शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने रविवारी बाजारात येणाऱया नागरिकांची संख्या कमी झालेली पहायला मिळाली. शिवाय रविवारीदेखील पाऊस सुरूच राहिल्याने सतत गजबजणाऱया गणपत गल्लीतदेखील तुरळक नागरिक दिसून आले. मात्र, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना घरीच रहाणे पसंत केले.
ग्रामीण भागात दमदार पाऊस
तालुक्मयातील कडोली, अगसगा, चलवेनहट्टी, हंदिगनूर, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी, केदनूर, अतिवाड, बेकिनकेरे, उचगाव, सुळगा, कुदेमनी, बेळगुंदी, बेळवट्टी, बिजगर्णी, बाकनूर, कर्ले आदी भागातही दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती, तलाव आणि नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. शिवाय मार्कंडेय नदीदेखील दुथडी भरून वाहू लागली आहे. यंदाच्या वर्षात कंग्राळी खुर्द येथील जुन्या पुलावर तिसऱयांदा पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱयांना पुन्हा पावसाची धास्ती निर्माण झाली आहे. यापूर्वी दोनवेळा नदीचे पाणी शिवारात घुसून मोठा फटका बसला होता. पुन्हा शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा वाढल्यास पिकांना धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. पावसाने लवकर उघडीप देण्याचा धावा ते करत आहेत.
यंदा जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने बळ्ळारी आणि मार्कंडेयच्या शेजारील शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे हजारो एकर परिसरातील भातपिकाला फटका बसला होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे पिकेदेखील जोमाने आली आहेत. मात्र, आता पुन्हा पावसाने जोर वाढविल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे पात्राशेजारी असलेल्या शेतकऱयांची धास्ती वाढली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
हिडकल डॅममधून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
येथील हिडकल डॅम (राजा लखमगौडा) जलाशयाच्या 10 दरवाजातून 20 हजार क्युसेक पाण्याचा घटप्रभा नदीमध्ये विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती हुक्केरीचे तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी दिली. गेल्या तीन-चार दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या घाट प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजा लखमगौडा जलाशयात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. या पार्श्वभूमीवर घटप्रभा नदीमध्ये 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठावर असलेल्या नागरिकांनी जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याचबरोबर हुक्केरी तालुक्याच्या मार्कंडेय जलाशयात 1400 क्युसेक पाणी आवक होत असल्याने 11 रोजी सायंकाळी 1 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, असे सूत्रांकडून समजते.
निपाणी परिसरात पावसाचा कहर
रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने परिसरात अक्षरशः कहरच केला. जणू काय आभाळ फाटलंय अशा पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे निपाणी तालुक्यातील दूधगंगा, वेदगंगा नदीवरील कारदगा, बारवाड, जत्राट, सिदनाळ, खडकोळ बंधारे पाण्याखाली गेले.