जिल्हय़ात ढगफुटीसदृश पाऊस, गणेशभक्तांच्या आनंदोत्सवात पावसाचे विघ्न
प्रतिनिधी/ सातारा
यावर्षी होणाऱया निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचा उत्साह टिपेला आला असताना पावसाची हजेरी गणेशभक्तांसह नागरिकांना डोकेदुखी ठरली आहे. बुधवारी दुपारी सातारा शहरासह जिल्हय़ातील अनेक भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने तांडव घातले. वीजेसह झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. तर अनेक दुकानगाळय़ांमध्ये पाणी साठले होते. तर वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंटसह अनेक ठिकाणी पाणी साठले होते. सुमारे दोन तास मुसळधार पावसाने रस्त्याची वाहतूक मंदावली होती तर गणेशोत्सवामुळे गर्दीने फुललेले रस्तेही ओस पडले होते. महामार्गावरही पाणी साठल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आल्यामुळे देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली असताना पावसाचे विघ्न आल्यामुळे देखावे पाहण्यासाठी तुरळक गर्दी दिसून येत आहे. त्याचा परिणाम व्यावसायिकांवरही मोठय़ा प्रमाणावर झाला आहे.
जिल्हय़ात सलग तीन दिवस पावसाचा धुमाकुळ पाहता आता ‘येरे पावसा’, ऐवजी ‘जारे जारे पावसा’, म्हणण्याची वेळ आली आहे. या कोसळणाऱया सरींचा जोरही तितकाच असल्याने नेहमी गजबजलेले रस्त्यांवर ही काही क्षणातच रिकामी होत आहेत. गणेशोत्सवाचा बहर ऐन रंगात आला असताना नियमित पडणाऱया मुसळधार पावसाने सातारकर चांगलेच हैराण झाले आहे.
जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण या तालुक्यात हे पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसाचा प्रमाण हे अधिक शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीस ही व्यत्यय निर्माण होत होता. पावसामुळे सर्वांचीच चांगलीच तारांबळ उडाली होती, पावसाचे प्रमाण अधिक असल्याने छत्री, रेनकोटसारखे साहित्य असुन ही जवळपास सर्वच नागरिक मिळल त्या ठिकाणी आडोसा घेऊन पाऊस जाण्याची वाट पहात होते. तासभर उभे राहूनही पाऊस थांबत नसल्यामुळे अनेकजणांनी भिजतच आपले घर गाठलं.
सायंकाळी 4.30 च्या सुमारास या पावसाला सुरूवात झाली व तब्बल तास ते दीड तास पावसाचा जोर हा कायम होता. गणेशोत्सवानिमित्त अनेक फेरीवाले विविध साहित्य घेऊन विक्रीस दाखल झाले आहेत. पावसाला सुरूवात झाल्याबरोबर आपला माल खराब होऊ नये याकरीता या विक्रेत्यांची एकच लगबग सुरू होती. बुधवारी सकाळपर्यंत जिल्हय़ात एकुण 42.7 टक्के इतका पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत एकुण जिल्हय़ात 790.3 इतका पाऊस पडला आहे. तसेच पुढीव काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
यातच शहर परिसरातील शेकडो मंडळांनी तब्बल दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मोठय़ा उत्साहाने उभारलेले गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यास नागरिकांना बाहेर पडणे कठीण जात असल्यामुळे अक्षरशः नाकीनऊ आणले आहे. गेले चार दिवस सातत्याने कोसळणाऱया पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात तरी व्यवसाय चांगला होईल या आशेने अनेक व्यापारी बंधूंनी सध्या मोठी गुंतवणूक करून विक्रीसाठी साहित्य तसेच माल आणलेला आहे. या पावसामुळे त्यांच्या व्यापारावरही मोठा परिणाम होत आहे.