रताळी वेल लागवड, भात पेरणीला लाभदायक : शेतकऱ्यांतून समाधानाचे वातावरण
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागात गुऊवारी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला दमदार पावसाने सुरुवात केल्याने माळ जमिनीत लावण्यात आलेल्या रताळी वेलींना तसेच भात पेरणीला लाभदायक ठरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत होते. चालू वषीच्या हंगामात पाऊस चांगला होणार असे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि मान्सूनपूर्व पावसानेही चांगली साथ दिल्याने बेळगावच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्गाने या भागातील मशागतीची कामे पूर्ण करून गेल्या दोन आठवड्यापासून रताळ्याची वेल तसेच माळ जमिनीतील भुईमूग, बटाटा बियाणे, भाताची पेरणी अशा विविध पिकांच्या पेरणीला, लागवडीचा शुभारंभ केला होता. मात्र मध्यंतरी पावसाने पूर्णत: ओढ दिली. त्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता लागून राहिली होती. रताळ्याच्या वेलीची लागवड करून आठवडा उलटला तरी पावसाची म्हणावी तशी साथ नसल्याने ही पिके कोमेजून जात होती. पुन्हा दुबार लागवड करावी लागणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गुऊवारी झालेल्या दमदार पावसामुळे या सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे पुन्हा माळ जमिनीतील खरीप हंगामातील बटाटा लागवड, भुईमूग, मिरची, मका, भाजीपाला या पिकांनाही आता जोर येणार आहे.