अनेक ओढ्याना पूर, जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी/अक्कलकोट
पूर्वा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे., घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले पालापूर यासह आदी गावात पावसाने थैमान घालत शेतीपिकाचे मोठे नुकसान केले. घोळसगाव येथील तलाव आधीच १०० टक्के भरून वाहत आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव सुद्धा १०० टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव घोळसगाव बादोले वागदरी शिरवळ सापळे आदी भागात मंगळवारी रात्री ९ वाजता पूर्वा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत होते. गेल्या आठ दिवसापासून हवामानामध्ये कमालीची घट झाली असून आर्द्रते बरोबरच उष्णतेच्या झळा सुद्धा सोसाव्या लागत होत्या. दि ६ रोजी सायंकाळी ९ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आश्लेषा नक्षत्रातच बोरगाव येथील पीर राजे बागसवार साठवण तलाव, घोळसगाव तलाव टक्के भरले असून त्याच बरोबर घोळसगाव साठवण तलाव १०० टक्के भरले. बोरगाव येथील कोळी तलावही १०० टक्के भरला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काल पडलेल्या पावसामुळे ऊस, मुग, उडीद, सोयाबीन, तूर आदी पिके ज्यादा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. कामात शेतकरी व्यस्त असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे करत असताना तारांबळ उडाली. समाधानकारक पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वर्षभर पुरेल इतके पाणी या भागातील जलस्त्रोतात उपलब्ध झाले आहे. काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून काही भागात मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर उन्हाळ्यापेक्षा कडक उष्णता आणि सायंकाळी गार वाऱ्यासह पाऊस असे चित्र दरोज पाहायला मिळत आहे.
पुलावर पाणी असल्याने संपर्क तुटला बोरगाव नजीक असलेल्या पुलावर भरपूर पाणी वाहत असल्याने रात्री पासून घोळसगाव व वागदरी कडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद पडला होता.त्यामुळे गावचा संपर्क तुटला होता.