कोकण, मध्य महाराष्ट्रावरील अतिवृष्टीचे ढग कायम
पुणे / प्रतिनिधी :
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यभर पावसाचा धडाका सुरू असून, काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. पावसाचे हे सत्र पुढचे काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे सावट आगामी चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र कायम असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ाच्या काही भागांत जोरदार पावसाची नोंद झाली. तर विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. पुणे, मुंबई, नगर, सातारा, सांगलीपासून सर्वदूर चांगला पाऊस होत आहे. पुण्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पुणे जिल्हय़ांतील नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, अनेक नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. शहरांतील अनेक रस्तेही जलमय झाले असून, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मराठवाडय़ात पावसाने कहर केला असून, नांदेड जिल्हय़ात मध्यरात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडविला. ढगफुटीसदृश पावसामुळे हजारो हेक्टरावरील पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा तिबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तर अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरले असून, या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत-नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदीचा पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हिंगोलीत पावसाचे थैमान
हिंगोली जिल्हय़ातही मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्हय़ातील वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा, आसेगाव यांसह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा आधार घ्यावा लागला. आसेगावमार्गे नांदेडकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. परभणी जिल्हय़ात लेंडी नदीला पूर आल्याने जवळपास 14 गावांचा संपर्क तुटला आहे.
उत्तर महाराष्ट्र, विदर्भातही कोसळधारा
उत्तर महाराष्ट्रातही पावसाने थैमान घातले असून, मागच्या 24 तासांत इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्हय़ाला पावसाने चांगलेच झोडपले. नंदूरबार, धुळे, जळगावातही पावसाची झड सुरू होती. विदर्भातील गडचिरोलीत पावसामुळे हाहाकार निर्माण झाला असून, 125 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
मागच्या 24 तासांत मुंबईत 7.6, नागपूर 8.2, पुणे 11.2, औरंगाबाद 4.1, नाशिक 57.7, कोल्हापूर 16.6, सोलापूर 35.6, रत्नगिरी 25.7, सातारा 13.4, सांगली 12.4, मालेगाव 5, जळगाव 4, परभणी 89, अकोल्यात 10.1, तर पणजीत 85.2 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा हा धडाका कायम राहणार आहे.
हेही वाचा : प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली सोने-चांदी अन् पैशांनी भरलेली बॅग
सर्वदूर पावसाचा अंदाज
पुढच्या चार दिवसांत कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी अवितृष्टीची व काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर सोसायटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही भागांत जोरदार पाऊस होईल. मराठवाडय़ातही मुसळधार पाऊस होणार असून, विदर्भात मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.