कोकणात रेड अलर्ट, मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा अंदाज
पुणे / प्रतिनिधी :
जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ात दमदार एन्ट्री केली असून, कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह राज्यात सर्वदूर पावसाचे धूमशान सुरू आहे. पावसामुळे राज्याला दिलासा मिळाला असला, तरी काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, रत्नागिरी व सिंधुदुर्गला रेड अलर्ट, तर मुंबईला ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे.
यंदाचा जून कोरडा गेल्याने राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व आशा जुलैच्या पावसावर असतानाच पहिल्याच आठवडय़ात पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. हवामान विभागाकडून कोकण व गोव्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक दिसत आहे. याशिवाय रायगड, मुंबई, पालघर, ठाणे व उपनगरांमध्ये पावसाचा धडाका सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोकणासह राज्याच्या अनेक भागांत एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत.
याशिवाय पुणे, जळगाव, कोल्हापूरपासून ते अकोला, नागपूरपर्यंत विविध भागांत पाऊस होत आहे. पुणे, पिंपरी व जिल्हय़ात मंगळवारी पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्हय़ात पावसाचा जोर अधिक होता. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. मागच्या 24 तासांत मुंबईत 117, नागपूर 28, पुणे 8.2, औरंगाबाद 2.3, नाशिक 5.4, कोल्हापूर 31.6, सोलापूर 0.4, रत्नागिरी 105, सातारा 4.5, सांगली 6.8, जळगाव 52, परभणी 7, अकोला 34 तसेच पणजीत 125.8 मिमी पावसाची नोंद झाली.
द्रोणीय स्थितीमुळे पाऊस
सध्या गुजरात किनारपट्टी ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांत पाऊस होताना दिसत आहे. मागच्या 24 तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. या भागांतील अनेक जिल्हय़ात पावसाने अक्षरश: थैमान घातले. याशिवाय विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशी जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या चार दिवसांत कोकणातील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीच्या भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा अंदाज
कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातही पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होईल. काही भागांत अतिवृष्टी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. याशिवाय मराठवाडा व विदर्भातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाल्याने वाहतूक मंदावली आहे. तर मध्ये रेल्वेच्या सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. डोंगरदऱ्यांमधून पाणी वाहू लागल्याने धबधबे प्रवाहित झाले आहेत. तर कुंभार्ली, परशुराम घाटासह काही घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.