आवक मंदावली, दरात भरमसाट वाढ, सर्वसामान्यांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
अतिपावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. एरवी 30 ते 40 रुपये किलो मिळणारा भाजीपाला 70 ते 80 रुपये झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. विशेषतः ढबू, काकडी, गवार, बिन्स, दोडकी, टोमॅटो, मेथी आदी भाजीपाल्यांचे दर भडकले आहेत.
शनिवारच्या किरकोळ बाजारात ढबू 80 रुपये किलो, काकडी 80 रुपये किलो, दोडकी 60 रुपये किलो, कांदे 20 रुपये किलो, गवार 80 रुपये किलो, बिन्स 80 रुपये किलो, ओली मिरची 50 रुपये किलो, वांगी 40 रुपये किलो, टोमॅटो 60 रुपये किलो, भेंडी 50 रुपये किलो, बटाटा 30 रुपये किलो, कारली 40 रुपये किलो, कोबी 10 रुपये, फ्लॉवर 20 रुपयांना 1, कोथिंबीर 20 रुपये पेंडी, कांदापात 10 रुपये पेंडी, मेथी 30 रुपये पेंडी, शेपू 20 रुपयाला 1 पेंडी असा भाजीपाल्याचा दर आहे. मागील काही दिवसात उष्म्यामुळे वाढलेल्या लिंबूचा दर देखील कमी झाला आहे. 10 रुपयाला 4 लिंबू याप्रमाणे विक्री सुरू आहे.
एप्रिल-मे महिन्यात सरासरीपेक्षा वळिवाचा पाऊस अधिक प्रमाणात झाला आहे. याबरोबर आता मान्सूनपूर्व पाऊसही सातत्याने होत असल्याने भाजीपाला पीक कुजले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. याचाच परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर होऊन दर गगनाला भिडले आहेत. आधीच महागाईच्या कचाटय़ात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला वाढत्या भाजीपाल्याच्या दराचे चटके सहन करावे लागत आहेत.
पुढील आठवडय़ापासून आवक वाढण्याची शक्यता
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱयांनी भाजीपाल्याची लागवड अधिक प्रमाणात केली आहे. विशेषतः कोथींबीर, मेथी, बिन्स आदी भाज्यांची पेरणी झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात भाजीपाल्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून काही प्रमाणात भाज्यांच्या दरात किंचित घट होण्याची शक्मयता आहे..